सुरुवातीला फ्लॉप आता मात्र हिट ! कथा पाहून 'या' मालिकांना मिळतेय प्रेक्षकांची पसंती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 5, 2021

सुरुवातीला फ्लॉप आता मात्र हिट ! कथा पाहून 'या' मालिकांना मिळतेय प्रेक्षकांची पसंती

https://ift.tt/3rE9Zj0
मुंबई- छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. काही मालिकांची कथा प्रेक्षकांना इतकी भावते की मालिकेच्या नावासह त्यातील कलाकारही प्रेक्षकांच्या वर्षानुवर्षे लक्षात राहतात. तर काही मालिका कधी सुरू झाल्या आणि कशी संपल्या हेदेखील प्रेक्षकांच्या लक्षात येत नाही. सगळा खेळ टीआरपीचा असल्याने प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादावर मालिकांचं पुढील भविष्य अवलंबून असतं. मालिकेची कथा आणि त्यातील कलाकार या दोन गोष्टी प्रेक्षकांना जिंकण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. तर काही मालिका कमी टीआरपीमुळे लवकर बंद होतात. मात्र आता सुरू असणाऱ्या काही मालिकांमधील सुरुवातीला फ्लॉप ठरलेल्या काही मालिका आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतायत. झी मराठी आणि कलर्स मराठी वाहिनीवर दोन महिन्यांपूर्वीच काही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. झी मराठीवर 'मन झालं बाजिंद', 'मन उडू उडू झालं', 'माझी तुझी रेशीमगाठ' आणि 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. तर कलर्स मराठी वाहिनीवर 'जीव माझा गुंतला' ही मालिका नव्याने सुरू झाली. मात्र झी मराठी मराठी वाहिनीवरील इतर मालिकांच्या तुलनेत 'मन झालं बाजिंद' या मालिकेला प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळत होता. तर 'जीव माझा गुंतला' मालिका देखील प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरली नव्हती. आता मात्र या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी ठरल्याचं दिसतंय. मालिकेच्या कथेला आता प्रेक्षकांची पसंती मिळतेय. सुरुवातीला मालिकांचा कमी असणारा टीआरपी आता वाढताना दिसतोय. 'मन झालं बाजिंद' मधील राया आणि कृष्णा यांची फुलणारी प्रेमकहाणी पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. तर 'जीव माझा गुंतला' मधील मल्हार आणि अंतराची नोकझोकही प्रेक्षकांना आवडत आहे. त्यामुळेच या मालिकांच्या टीआरपीत वाढ झाली आहे. सुरुवातीला फ्लॉप ठरणाऱ्या या मालिका आता प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसतायत.