औरंगाबाद: लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यातच औरंगाबादमधील करोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. औरंगाबादमध्ये रात्रभरातच २८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे येथील बाधितांची संख्या ३४९ झाल्याने आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. औरंगाबादमध्ये रात्रभरात २८ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २८ रुग्ण हे कंटेन्मेंट झोनमधील आहेत. तर चार रुग्ण हे नव्या विभागातील आहेत. त्यामुळे हे चारही नवे विभाग सील करण्यात येत असून या ठिकाणची टेस्टिंग वाढवण्यात येणार आहे. नव्या परिसरात सापडलेल्या करोनाबाधितांच्या कुटुंबीयांची तपासणी करण्यात येणार असून त्यांना होम क्वॉरंटाइन करण्यात येत आहे. तसेच बाधितांचे शेजारी आणि त्यांच्या संपर्कातील लोकांचीही तपासणी करण्यात येणार असून त्यांनाही क्वॉरंटाइन करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, औरंगाबादमधील एकूण ३४९ रुग्णांपैकी आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २६ जण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणापेक्षा नव्याने सापडणाऱ्या करोनाबाधितांचा आकडा अधिक असल्याने आरोग्य प्रशासनासमोर आव्हान निर्माण झालं आहे.