
म.टा. प्रतिनिधी, नगर: 'राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही, असे म्हणणाऱ्या विरोधकांना मुंगेरीलाल के हसीन सपने बघू द्या,' असा टोला राष्ट्रवादीचे नेते मंत्री यांनी राज्यातील भाजप नेत्यांना लगावला. 'हे सरकार मजबूत आहे व पाच वर्षे मजबुतीने महाराष्ट्राच्या जनतेचा विकास करणार आहे,' असेही त्यांनी ठामपणे सांगितले. औरंगाबाद येथून आष्टी (जि. बीड) येथे जात असताना मंत्री मुंडे हे नगरच्या सरकारी विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सातत्याने राज्य सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांचा चांगला समाचार घेतला. ते म्हणाले, 'राज्यातील सरकार मजबूत आहे. हे सरकार फक्त टिकण्यासाठी चालतंय, असं केवळ टीकाकार म्हणतात. सरकार मधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्र पक्ष असे आम्ही एकरूप झालो आहोत. एकरूप होऊन महाराष्ट्राच्या जनतेचा विकास करीत आहोत. आज महाराष्ट्रात जे काम दिसते आहे, ते सरकारचे आहे. या कामाचे श्रेय सरकारमधील तिन्ही पक्षांचे आहे,' असेही ते म्हणाले. राज्यातील भाजप नेत्यांवर टीका करताना मुंडे म्हणाले, 'विरोधीपक्ष आम्ही केलेल्या चांगल्या कामाला चांगले कधी म्हणणारच नाही. कारण ते विरोधी पक्षाचे कामच आहे. विरोधी पक्ष हा आमच्यावर कायम टीका करणार आहे. ज्या दिवशी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, त्या दिवसापासून विरोधी पक्ष हा टीकाच करतोय,' असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. यांनी राज्यातील सरकार स्थगित सरकार असल्याची टीका केली होती. त्याबाबत मंत्री धनंजय मुंडे यांना विचारले असता, 'त्यांना स्थगितीचा अर्थ कळाला तर चांगले होईल,' अशी प्रतिक्रिया देत त्यांनी अधिक बोलणे टाळले.