मुंबईः मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं याबाबत काही शंकाच नाही पण ओबीसीच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही, अशी ठाम भूमिका विरोधी पक्ष नेते यांनी घेतली आहे. भाजपच्या ओबीसी कार्यकारणीची बैठकीत ते बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण देताना त्यात ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असं कलम त्यात टाकलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. पण या कलमाला कोणतीही स्थगिती दिली नाही. या कलमाद्वारे आम्ही ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिलं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवाय, ओबीसी आरक्षणात कोणताही वाटेकरी स्वीकारणार नसून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, असा इशाराच त्यांनी दिला आहे. ओबीसींना आरक्षण देण्याची मागणी करत ओबीसी मंत्री बाहेर आंदोलन करत आहेत. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीत गप्प बसतात. असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे. तसंच, येत्या काळात ३४६ ओबीसी घटकांचा मेळावा घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.