नवी दिल्ली : देशात ७२ वा प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत एक आगळं-वेगळं दृश्यं दिसणार आहे. राजपथावर परेड पार पडल्यानंतर दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांकडून 'टॅक्टर रॅली' काढण्यात येणार आहे. तसंच १ फेब्रुवारी रोजी 'अर्थसंकल्पीय दिवस' निमित्तानंही शेतकरी संसदेपर्यंत 'पदयात्रा' काढण्याची योजना तयार करत आहेत. कायदा सुव्यवस्था ध्यानात घेतानाच ट्रॅक्टर रॅली मध्य दिल्लीमध्ये प्रवेश करणार नाही तसंच प्रजासत्ताक दिनाची परेड संपुष्टात आल्यानंतरही शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात होईल, असं आश्वासन शेतकरी संघटनांनी दिलंय. या ट्रॅक्टर रॅलीमध्ये जवळपास दोन लाख ट्रॅक्टर्सचा सहभाग असण्याची शक्यता आहे. सिंघू, टिकरी, गाझीपूर या सीमांहून ही ट्रॅक्टर रॅली आगेकूच करणार आहे. LIVE अपडेट : - ट्रॅक्टर रॅली निघण्यापूर्वीच सिंघू सीमेवर शेतकऱ्यांनी पोलिसांनी उभारलेले बॅरिकडेस् तोडल्याचं समजतंय. पन्नू समूहाच्या जवळपास ५००० शेतकऱ्यांनी आउटर रिंग रोडवर ट्रॅक्टर रॅली काढणार असल्याचं म्हटलं होतं. - राजधानीकडे निघालेल्या वाहनांना रोखण्यासाठी करनाल बायपासवर मंगळवारी एका रात्रीतच एक भली मोठी तात्पुरती भिंत उभारण्यात आलीय. - दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर सकाळपासूनच शेतकरी मोठ्या संख्येत आपापल्या ट्रॅक्टरसहीत राजधानीकडे कूच करत असलेले दिसून येत आहेत. 'ट्रॅक्टर रॅली'त सहभागी होण्यासाठी हे दिल्लीत दाखल होत आहेत. सोमवारी, किसान मजूर संघर्ष समितीनं मात्र एक वेगळीच घोषणा केलीय. संयुक्त किसान मोर्च आणि पोलिसांद्वारे निश्चित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेड मार्गावर आपण सहमत नसल्याचं या संघटनेनं म्हटलंय. आपण दिल्लीच्या रिंग रोडवरही जाणार असल्याचं जाहीर करण्ययात आलंय. त्यामुळे वाद उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. पोलिसांकडून शेतकरी संघटनांशी झालेल्या अनेक बैठकांनंतर सीमेवर तीन ठिकाणी मार्ग बंद करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांकडून वाहतुकीसंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलीय. यात वाहनचालकांना नॅशनल हायवे ४४, सिंघू तसंच टिकरी सीमा भागापासून लांब राहण्याचा प्रयत्न करण्याची सूचना करण्यात आलीय. गाझीपूर सीमा, राष्ट्रीय महामार्ग २४, रस्ता क्रमांक ५६ आणि अप्सरा सीमेवर जाणाऱ्या रस्तेही टाळावेत, असा सल्ला पोलिसांकडून देण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांसमोर अशी स्थिती कदाचित पहिल्यांदाच समोर येत असावी. त्यामुळेच, परेड संपल्यानंतरही दिल्ली पोलिसांना अधिक सतर्क राहावं लागणार आहे. राजपथावरची परेड संपुष्टात आल्यानंतरही पोलीस संपूर्ण तैनातीसह कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार टाळण्यासाठी रस्त्यांवर सज्ज राहणार आहेत. शेतकरी संघटनांची ट्रॅक्टर रॅली दुपारी सुरू होऊन सायंकाळी उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याचं दिसतंय.