मुंबई: फेसबुक, ट्विटर व व्हॉट्सअॅपसारख्या सोशल माध्यमांवर बंदी घालण्याची चर्चा सध्या देशात सुरू आहे. हाच धागा पकडून शिवसेनेनं केंद्रातील मोदी सरकारवर खोचक शब्दांत टीका केली आहे. 'समाज माध्यमांवर बंदी घालण्याची घाई सरकारनं करू नये. तसं झालं तर मेहुल चोक्सीला पकडल्याचा व भारतात आणल्याचा आनंदसोहळा भक्तमंडळ कसे साजरा करणार?,' असा बोचरा सवाल शिवसेनेनं केला आहे. () देशाला सध्या करोना संसर्गाचा विळखा पडला आहे. रुग्णांचे आकडे दिवसागणिक वाढवले जात आहेत. भारतातील या परिस्थितीचे प्रतिबिंब जगभरातील मीडियात उमटलं आहे. भारतातील करोना मृतांचे खरे आकडे लपवले जात असल्याचं बोललं जात आहे. ट्विटरच्या माध्यमातून या बातम्या सगळीकडं पोहोचत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या ‘ट्विटर’ मुख्यालयावरच मध्यरात्री पोलिसांनी धाडी घालण्यात आल्याचा दावा करत शिवसेनेनं ''च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. वाचा: पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी सध्या परदेशात आहे. त्याला डॉमनिकन देशात अटक करण्यात आलं आहे. त्याच्या प्रत्यार्पणाच्या चर्चाही सुरू आहेत. हाच धागा पकडून शिवसेनेनं भाजपला डिवचलं आहे. समाजमाध्यमांवर बंदी आल्यास भक्तमंडळींची अडचण होईल. चोक्सीसारख्यांना बेड्या ठोकल्याचा आनंद त्यांना साजरा करता येणार नाही, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. या निमित्तानं शिवसेनेनं देशातील औद्योगिक वातावरणावरही टिप्पणी केली आहे. 'देशातील किमान दहा हजारांवर कोट्यधीश उद्योगपती, व्यापारी मंडळींनी गेल्या सात वर्षांत ‘स्वदेश’ सोडून इतर देशात जाऊन बस्तान बसवलं आहे. यातील अनेकांची गणना नामवंतांत होते व त्यांनी कोणताही आर्थिक घोटाळा केलेला नाही, पण देशाचा आर्थिक व औद्योगिक माहोल ठीक नसल्याचं कारण देत ते शांतपणे निघून गेले. हे सत्य असेल तर गाजावाजा केलेल्या ‘स्टार्टअप इंडिया’, ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ वगैरे खेळांचा काय निकाल लागला?,' अशी विचारणाही शिवसेनेनं केली आहे. 'गेल्या सात वर्षांत देशात नवे उद्योग, नवी गुंतवणूक आलीच नाही. उलट जी होती तीसुद्धा गेली. पंडित नेहरूंच्या काळात मेहनतीने उभारले गेलेले अनेक सार्वजनिक उपक्रम व उद्योग विकले जात आहेत किंवा नव्या ईस्ट इंडिया कंपनीला चालवायला दिले गेले आहेत. एअर इंडियाचा बाजार जाणीवपूर्वक उठवला गेला. भारतीय रेल्वे भविष्यात आपली राहणार नाही. तेल कंपन्यांचे सौदे पडद्यामागून सुरू आहेत. बाजूची चीन, बांगलादेशसारखी राष्ट्रे त्यांचे ‘जीडीपी’, दरडोई उत्पन्न वाढवत आहेत, पण भारतात करोनामुळे ‘डोकी’ कमी करण्याचा खाटीकखाना उघडला गेला आहे,' असा घणाघाती आरोपही शिवसेनेनं केला आहे. वाचा: