नवी दिल्लीः देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने गंभीर स्थिती निर्माण झाली होती. आता करोनाच्या तिसऱ्या लाटेचा ( ) इशारा देण्यात आला आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आयआयटी कानपूरने नागरिकांना आधीच सतर्कतेचा इशारा दिला आहे. ही सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान येऊ शकते, असं आयआयटी कानपूरचे प्राध्यापक राजेश रंजन आणि महेद्र वर्मा यांच्या टीमने केलेल्या अभ्यासातून हा दावा केला आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत नागरिकांमध्ये चिंता असल्याचं दोन्ही प्राध्यापकांनी म्हटलं आहे. एसआयआर मॉडेलचा उपयोग करून आम्ही करोनाच्या दुसऱ्या लाटेतील मापदंडाचा उपयोग करून संभाव्य तिसऱ्या लाटेने निर्माण होणारी परिस्थिती समोर मांडली. यानुसार देशात १५ जुलैपर्यंत पूर्णपणे लॉकडाउन हटवला जाईल. पण ऑक्टोबरमध्ये येणारी तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी असेल, असं त्यांनी सांगितलं. प्राध्यापक राजेश रंजन आणि महेंद्र वर्मा यांची आयआयटी कानपूरमधील टीम देशातील करोनाचा संभाव्य धोक्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. ईशान्येतील काही राज्य (मिझोराम, मणिपूर, सिक्कीम ) वगळता जवळपास सर्वच राज्यात दुसरी लाट बरीच ओसरली आहे, असं ते म्हणाले. अभ्यासात उपयोगात आणलेल्या मॉडेलमध्ये लसीकरणाचा समावेश करण्यात आलेला नाही. यामुळे येणारी लाटेचा धोका खूप कमी असायला हवा. आता लसीकरणासोबत मॉडेलमध्ये सुधारणा करून अलिकडच्या आकड्यांवरून आणखी अभ्यास केला जाईल, असं प्राध्यापक म्हणाले. करोना पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्क्यांहून कमी झाला आहे. पण केरळ, गोवा, सिक्कीम आणि मेघालयमध्ये अजूनही पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांहून अधिक आहे. देशात दररोज आढळून येणाऱ्या करोना रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. पण केरळ, गोवा, सिक्कीम आणि मेघालयात रोजचा पॉझिटिव्हिटी दर हा १० टक्क्यांच्या वर आहे, असं अभ्यासातून समोर आलं आहे.