मुंबईकरांनी करून दाखवलं; करोना संकटात मिळाला मोठा दिलासा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 12, 2021

मुंबईकरांनी करून दाखवलं; करोना संकटात मिळाला मोठा दिलासा

https://ift.tt/3hWay1i
म. टा. विशेष प्रतिनिधी, करोनाची तिसरी लाट येणार असल्याचा दावा तज्ज्ञांकडून होत असताना, मुंबईतील रुग्णसंख्येचे प्रमाण हळूहळू नियंत्रणात येत आहे. रुग्णसंख्येच्या दुपटीचा कालावधीही आता वाढला आहे. पहिल्यांदाच तो ९०० दिवसांच्या पुढे गेला असून, रविवारी तो सरासरी ९२८ दिवस इतका नोंदवण्यात आला. दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असताना, रुग्णदुपटीचा कालावधी हा १९० ते ३२० दिवसांपर्यतही आला होता. आर उत्तर, एफ उत्तर, एच पश्चिम, के पश्चिम या प्रभागांमध्ये रुग्णदुपटीचा कालावधी हा ८०७ दिवसांइतका वा त्यापेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. एल्फिन्स्टन, घाटकोपर, अंधेरी, चेंबूर, कुर्ला, दादर, मुलुंड येथे रुग्णदुपटीचा कालावधी हजार दिवसांपेक्षा अधिक असून, मरिन लाइन्स येथे तो २,०५९ दिवसांचा नोंदवण्यात आला आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी प्रशासनाने सांघिक प्रयत्न केल्यामुळे हे उद्दिष्ट साध्य केल्याचे समाधान व्यक्त केले. मात्र, तरीही विरोधातील ही लढाई अद्याप संपलेली नाही. त्यामुळे अजूनही दक्ष राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. मुंबईमध्ये ७७,८४,५२० जणांनी विलगीकरणाचा कालावधी आत्तापर्यंत पूर्ण केला आहे. तर ९८,५११ व्यक्ती घरगुती स्वरूपाच्या विलगीकरणामध्ये आहेत. संसर्गाचा वेग अधिक दिसतो, त्या भागांमध्ये प्रतिबंधित क्षेत्राची संख्या वाढवण्यात येते. मुंबईमध्ये एस आणि के पूर्व या प्रभागांमध्ये प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या पाच इतकी आहे, तर मुंबईत २,७८९ क्षेत्रांना प्रतिबंधातून मुक्त करण्यात आल्याचे पालिकेने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. राज्याच्या मृत्युदर विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी रुग्णदुपटीचा कालावधी वाढणे हे चांगले लक्षण असले, तरीही रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात येण्यावर लक्ष्य केंद्रीत करायला हवे, असे सांगितले. आजही प्रत्येक आठवड्यात ९२ ते १०० मृत्यूंची नोंद मुंबईमध्ये होत आहे. ही संख्या कमी व्हायला हवी. निर्बंधाचे कसोशीने पालन केले नाही, तर रुग्णसंख्येमध्ये पुन्हा वाढ होण्यास वेळ लागणार नाही, अशीही चिंता त्यांनी व्यक्त केली. - मुंबईतील लक्षणे नसलेले रुग्ण - ३,४०६ - लक्षणे असलेले रुग्ण -३,३८२ - अत्यवस्थ रुग्ण - ६९६ - रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - ७,०१,७१० - मृत्यू - १५,६१२