मुंबई इंडियन्सच्या हातून सामना कधी निसटला, रोहित शर्माने सांगितला टर्निंग पॉइंट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 27, 2021

मुंबई इंडियन्सच्या हातून सामना कधी निसटला, रोहित शर्माने सांगितला टर्निंग पॉइंट

https://ift.tt/3ibVBsS
शारजा : मुंबई इंडियन्सला आरसीबीबरोबरचा सामना जिंकू शकला असता. पण मुंबई इंडियन्सच्या हातून हा सामना कधी निसटला, या सामन्याचा टर्निंग पॉइंट नेमका काय ठरला, हे रोहित शर्माने सामना संपल्यावर सांगितले आहे. मुंबई इंडियन्ससाठी कोणता टर्निंग पॉइंट ठरला, पाहा...रोहित शर्माने याबाबत सामना संपल्यावर सांगितले की, " आरसीबीने ज्यापद्धतीने फलंदाजी केली ते पाहिले तर त्यांना १८० पर्यंत धावा करता आल्या असत्या. पण आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना आमची सुरुवात चांगली झाली होती. पण मी चुकीचा फटका मारून बाद झालो आणि हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. कारण मी चांगल्या धावा करत होतो, पण मोक्याच्या क्षणी चुकीचा फटका मारून मी बाद झालो. तिथेच सामना आरसीबीच्या बाजूने झुकायला सुरुवात झाली. माझ्यामते आमच्या फलंदाजांनी जास्त मेहनत घेणे गरजेचे आहे. " आरसीबीने मुंबईपुढे १६६ धावांचे आव्हान ठेवले असले तरी ते मोठे नक्कीच नव्हते. कारण या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक यांनी आक्रमक सुरुवात केली होती. या दोघांनी ५७ धावांची सलामीही दिली होती. त्यावेळी मुंबई इंडियन्सचा संघ हा सामना जिंकेल असे वाटत होते. पण मोक्याच्या क्षणी रोहित शर्मा आऊट झाला आणि तिथेच सामना आरसीबीच्या बाजूने फिरल्याचे पाहायला मिळाले. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे १० सामने झाले आहेत. या १० सामन्यांमध्ये मुंबई इंडिन्सला सहा लढतींमध्ये पराभव पत्करावा लागला आहे, तर चार विजय त्यांच्या गाठिशी आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे आता आठ गुण असून रनरेटमध्येही ते मागे आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाची आता सातव्या स्थानावर घसरण झाली आहे, आतापर्यंत मुंबई इंडियन्सचा संघ एवढ्या खालच्या स्थानावर कधीही पाहायला मिळाला नव्हता. गुणतालिकेत सातव्या स्थानावर गेल्यामुळे कर्णधार रोहितची चिंता वाढली आहे. कारण आता त्यांना जर प्ले-ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना चारही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. तीन सामने पराभूत झाल्यावर मुंबईचा संघ सलग चार सामने कसे काय जिंकणार, याचे टेंशन आता रोहितला आले असेल. त्यामुळे मुंबईच्या संघासाठी आता ही स्पर्धा कठीण होऊन बसली आहे.