
मुंबई : नोटबंदीनंतर उदयास आलेल्या फिनटेक बाजारपेठेला काबीज करणाऱ्या 'पेटीएम'ने आज गुरुवारी समभाग विक्रीतून १८३०० कोटी उभारले. मात्र ज्यांच्या जिवावर हे भांडवल उभारले त्याच गुंतवणूकदारांना मात्र पहिल्याच दिवशी कंगाल केले. देशातील आजवरचा सर्वात मोठा आयपीओ ठरलेल्या पेटीएमची पालक कंपनी असलेल्या 'वन ९७ कम्युनिकेशन्स'चा आज भांडवली बाजारातील प्रवेश गुंतवणूकदारांसाठी कटु आठवणी देऊन गेला. 'वन ९७ कम्युनिकेशन्स'च्या शेअरची इश्यू प्राईसच्या तुलनेत ९ टक्के डिस्काउंटमध्ये नोंदणी झाली होती. सुरुवात निराशाजनक झाल्याने शेअरवर विक्रीचा दबाव वाढला. उत्तरोत्तर हा दबाव वाढत गेला. कंपनीच्या अवाजवी मूल्याबाबत जाणकारांचे मत प्रदर्शन होऊ लागले. त्यातून बाजारात वन ९७ कम्युनिकेशनची चौफेर विक्री झाली. अखेर बाजार बंद होताना तो तब्बल २७.४ टक्के घसरणीसह स्थिरावलं. आजच्या सत्रात पेटीएमने १५६४ रुपयांचे लोअर सर्किट देखील गाठले होते. पहिल्याच दिवशी झालेल्या निराशाजनक कामगिरीने पेटीएमच्या व्यावसायिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कंपनीने आयपीओसाठी फुगवून दाखवलेले बाजार मूल्य आणि जवळपास ३००० कोटींचा तोटा आजच्या पडझडीसाठी करणीभूत ठरला आहे. याशिवाय पेटीएमसाठी आणखी एक डोकेदुखी वाढवणारे कारण ठरले ते चीनी कंपनीची पेटीएममध्ये गुंतवणूक. मागील वर्षदीड वर्षात भारत आणि चीनमधील संबंध ताणले गेले आहेत. गलवान खोऱ्यात चिनी सैन्य आणि भारतीय जवानांमध्ये झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे. या घटनेनंतर भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे तसेच सरकारकडून चिनी कंपन्यांची आर्थिक कोंडी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. दरम्यान, पेटीएमची पालक कंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन्समध्ये चीनमधील दिग्गज ई कॉमर्स कंपनी अलीबाबा आणि अॅंट ग्रुपची जवळपास ३१ टक्के हिस्सेदारी आहे. चिनी कंपनी पेटीएमची मोठी गुंतवणूकदार आणि भागीदार असल्याचे गुंतवणूकदारांना खटकले आहे. त्यामुळेच आज शेअरची सुमार नोंदणी झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. आयपीओमधून हिस्सा विक्री झाल्यानंतर देखील अलीबाबा समूहाच्या हिस्सेदारीवर फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे चिनी गुंतवणूकदार असण्याची आज पेटीएमला भांडवली बाजारात मोठी किंमत चुकवावी लागली.Macquarie Capital या जागतिक पातळीवरील कंपनीने पेटीएमचा शेअर भाव १२०० रुपयांपर्यंत खाली येईल, असा नवा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजाने गुंतवणूकदारांच्या मनात धडकी भरली आहे. म्हणाले...आजच्या पडझडीनंतर पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमुख विजय शेखर शर्मा यांनी गुंतवणूकदारांना भरोसा देण्याचा प्रयत्न केला. शर्मा म्हणाले की आजची कामगिरी म्हणजे आजचा पहिलाच दिवस आहे. यावरून कंपनीच्या दीर्घकालीन कामगिरीची तुलना करता येणार नाही, असे शर्मा यांनी सांगितले. आम्ही अजूनही नवखे आहोत आणि कोणत्याही बड्या टेक्नॉलॉजी कंपनीचे आम्ही वारस नाहीत. मात्र एका मोठ्या कंपनीमध्ये स्वतःला परावर्तित करण्याची क्षमता आमच्यात आहे, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.