मुंबई: 'माजी मुंबई पोलिस आयुक्त यांची वर्तणूक पूर्वीही चुकीची राहिली आहे. त्यांनी मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन केली आहे', असे म्हणणे सीआयडीतर्फे विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी मंगळवारी त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्याची विनंती करताना अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी आर. एम. नेर्लीकर यांच्यासमोर मांडले. सीआयडीच्या या अर्जावर आज, बुधवारी न्यायालयाकडून योग्य तो आदेश होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे व आशा कोरके यांची अधिक चौकशीसाठी सीआयडी कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवादही जगताप यांनी मांडला. तर गोपाळे यांची बाजू मांडताना अॅड. अनिकेत निकम यांनी अटक कारवाई चुकीची व वाईट हेतूने असल्याचा आरोप केला. 'गोपाळे हे उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलिस अधिकारी आहेत. त्यांना अनेक पदके मिळाली आहेत आणि त्यांनी अनेक गुन्हेगारी प्रकरणांचा यशस्वीरीत्या छडा लावण्याची कामगिरी केली आहे. फिर्यादी श्यामसुंदर अग्रवाल यांनी एफआयआरमध्ये आरोप केला आहे की, त्यांच्या मीरा-भाईंदरमधील घरावर छापा टाकल्यानंतर गोपाळे यांनी त्यांच्यासमोर पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांना फोन केला आणि अग्रवाल यांना अटक न करण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली. त्यांनी अग्रवालकडे मागणी केली की पठाण यांच्याकडे, हे काहीच स्पष्ट होत नाही. पठाण हे वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांच्याकडे ते कसे मागणी करू शकतात. त्यामुळे एफआयआरमध्येच विसंगती आहेत. तरीही गोपाळे यांनी चौकशीत चार वेळा सहकार्य केले आहे. त्यामुळे कोठडी देण्यात येऊ नये', असा युक्तिवाद निकम यांनी मांडला. 'आशा कोरके यांची आतापर्यंतची कारकीर्द पूर्णपणे निष्कलंक आहे. त्यांनी या आरोपांविषयी सहा वेळा चौकशीला सामोरे जाऊन सीआयडीला पूर्ण सहकार्य केले आहे. त्यांच्याविरोधात कोणताही पुरावा नसल्याने सीआयडी कोठडी मंजूर करण्यात येऊ नये', असा युक्तिवाद अॅड. राहुल आरोटे यांनी मांडला. सात दिवसांची पोलिस कोठडी खंडणीच्या सुमारे ५० लाखांच्या देवाणघेवाण केल्याची साखळी आम्हाला सापडली असून हवाला ऑपरेटर मार्फत हा व्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे यासंदर्भातील अधिक चौकशीसाठी तसेच मोबाइल कॉल डिटेल्स, टॉवर लोकेशन, हा व्यवहार रोखीने झाल्याने त्याबाबतची अधिक माहिती काढायची असल्याने आरोपींची कोठडी गरजेची असल्याची मागणी सीआयडीच्या वतीने करण्यात आली. न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांची सात दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली. खंडणीच्या गुन्ह्यात या दोघांना अटक करण्यात आली असून परमबीर सिंह यांच्यासह अकबर पठाण यांच्यासह सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत शिंदे, संजय पाटील हे पोलिस अधिकारी गुन्ह्यात आरोपी आहेत.