
अमरावती : जिल्ह्यातील अतिसंवेदनशील शहर म्हणून म्हणून परिचित असलेल्या अचलपूर येथे रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास झेंडा काढण्यावरून झालेला वाद विकोपाला गेला. दोन गटात झालेल्या वादानंतर शहरात जमावबंदी लावण्यात आली आहे. अचलपूर शहरातील प्रवेशद्वार असलेल्या खिडकी गेट आणि दुल्हा गेट येथील ऐतिहासिक मोठ्या दरवाजांवर दरवर्षी सण-समारंभ प्रमाणे विविध धर्माचे झेंडे लागतात. मात्र काल रात्री बारावाजेच्या सुमारास काही असामाजिक तत्वांनी येथील झेंडा काढल्याने वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत बदलून दोन गटात राडा झाला. मध्यरात्री शहरवासीय झोपेत असताना हा राडा झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच एसआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनी मिळून कारवाई केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी यावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याची माहिती समोर आली आहे. स्टेशनचे ठाणेदार गरुड यांनी या घटनेबाबात माहिती दिली. अचलपुरात दोन गटात झालेला वाद विकोपाला जाण्याच्या पूर्वी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. शहरात रात्रीपासून जमाबंदी सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.