मुख्यमंत्र्यांच्या पैठणच्या सभेला अंगणवाडी सेविकांना उपस्थित राहण्याचे आदेश? सोशल मीडियावर पत्र व्हायरल - Times of Maharashtra

Sunday, September 11, 2022

demo-image

मुख्यमंत्र्यांच्या पैठणच्या सभेला अंगणवाडी सेविकांना उपस्थित राहण्याचे आदेश? सोशल मीडियावर पत्र व्हायरल

https://ift.tt/HITxFCk
nbt-video
औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे यांची पैठणमधील एक सभा राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यावेळी संदिपान भुमरे यांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यांचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले होते. संदिपान भुमरे यांनी आदित्य ठाकरेंची पैठणमधील सभा आणि अंबादास दानवे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पैठणला मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित केली आहे. त्या सभेत मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणार असल्याचं भुमरे म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी एक पत्र व्हायरल होतं आहे. त्या पत्रातील मजकुरानुसार अंगणवााडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविकांना एकनाथ शिंदे यांच्या सभेला पैठणला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन त्याची पुष्टी करत नाही. व्हायरल पत्रात काय? सोशल मीडियात एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प २ औरंगाबाद या लेटरहेडवर ८ सप्टेंबर २०२२ तारीख असलेलं एक पत्र व्हायरल होत आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांचा १२/०२ /२०२२ सोमवारी, रोजी पैठण मतदारसंघात सभा आयोजित केली असून आपल्या प्रकल्पातील सर्व पर्यवेक्षिका तसेच ४२ गावातील अंगणवाड्या सेविका, मदतनीस सर्व यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत गटविकास अधिकारी यांच्या सूचना आहेत. तरी सदर कार्यक्रमास कावसानकर स्टेडियम, पैठण येथे ठीक सकाळी १०.०० वाजता उपस्थित राहावे, असा मजकूर व्हायरल पत्रात आहे. व्हायरल पत्राच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पत्राच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सोशल मीडियावरील पत्रात एका ठिकाणी ८ सप्टेंबर २०२२ अशी तारीख आहे. तर दुसऱ्या ठिकाणी १२ /०२/ २०२२ अशी तारीख आहे. दुसरीकडे या पत्रातील वाक्यरचनेबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळं हे पत्र नक्की खरं आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमक्याचे लग्न अन तमकेच वऱ्हाडी! गतवेळी रिकाम्या खुर्च्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रसंग मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर ओढावला होता. आता तशी फजिती नको म्हणूनच की काय तालुक्यातील अंगणवाडी सेविका मुख्यमंत्र्यांच्या सभेला बोलावण्यात येत आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. आता या बिचाऱ्या महिला चिखल तुडवत आपले काम सोडून पैठणला येतील. असे रिकामे उद्योग या भगिनींना सांगण्यापेक्षा त्यांचे मानधन वेळेत मिळेल याकडे जास्त लक्ष देण्याची गरज या सरकारला वाटत नाही, असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दनवे यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे या सभेला येणाऱ्या इतरांसाठी विशेष 'रोख पॅकेज'ची व्यवस्था करण्यात आली आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

Pages