मउलचय पलख सहळयतल पहल उभ रगण नतरदपक अन मउल... मउल... गगनभद आवज - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 21, 2023

मउलचय पलख सहळयतल पहल उभ रगण नतरदपक अन मउल... मउल... गगनभद आवज

https://ift.tt/RJgrUB4
सातारा : 'माउली... माउली... असा गगनभेदी घुमणारा आवाज... लाखो वारकऱ्यांच्या लागलेल्या एकसारख्या नजरा अन् रोखलेला श्वास... अशा भारावलेल्या वातावरणातून वैष्णवांच्या मेळ्यातून माउलींचा आणि स्वाराच्या अश्वांनी केलेल्या नेत्रदीपक दौडने लाखो वैष्णवांच्या नेत्रांचे पारणे फेडले. श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण फलटण तालुक्यातील चांदोबाचा लिंब येथे मंगळवारी चार वाजता पार पडले.दुपारी साडेबारा वाजता विधिवत नैवद्य दाखवून माध्यान्ह आरती झाली. त्यानंतर लोणंद येथील अडीच दिवसांच्या मुक्कामानंतर श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा दुपारी खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश करण्यासाठी मार्गस्थ झाला. यावेळी हजारो लोणंदकरांनी माउलींच्या पालखीला सरहद्द ओढ्यापर्यंत येऊन निरोप दिला. त्यानंतर सोहळा उभ्या रिंगणासाठी चांदोबाच्या लिंबकडे निघाला.दुपारी सव्वातीन वाजता माउलींचा पारंपरिक मानाचा नगारखाना चांदोबाचा लिंब येथे आला. त्यानंतर काही वेळाने माउलींचा पालखी रथ मंदिरासमोर आल्यावर उपस्थितांमध्ये माउलींच्या दर्शनासाठी उत्सुकता वाढली. यावेळी वैष्णवांच्या उत्साहाने सारा आसमंत भक्तीरसात न्हाऊन निघाला. चांदोबाचा लिंब येथे दुपारी सोहळ्यातील राजाभाऊ चोपदार आणि रामभाऊ चोपदार यांनी सोहळ्याच्या अग्रभागापासून पालखीच्या रथापर्यंत रिंगण लावून घेतले. यावेळी साऱ्यांचे डोळे गर्दीतून धावत येणाऱ्या अश्वांकडे लागले होते. चोपदारांनी हात उंचावून इशारा करताच दुतर्फा वैष्णवांच्या मेळ्यातून माउलींचा आणि स्वाराचा अश्व एका पाठोपाठ धावत सुटले. रथापुढील २७ आणि मागील २० दिंड्यांपर्यंत धावत जाऊन अश्वांनी पुन्हा माघारी दौड घेत लाखो वैष्णवांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी दौड वारीतील पहिले उभे रिंगण पूर्ण करताच उपस्थितांनी माऊली... माउलींचा एकच गजर केला. त्यानंतर अश्वाच्या टापाची माती ललाटी लावत धन्य झाल्याची भावना व्यक्त केली. महिला भाविकांसह वारकऱ्यांनी फुगड्या, फेर धरत पारंपरिक खेळ करत मनसोक्त आनंद लुटला. यावेळी अश्वाचा स्पर्श आणि पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. त्यानंतर मोठ्या भक्तीभावाने डोक्यावर तुळशी वृंदावन, खांद्यावर भगवी पताका घेऊन जात होते. टाळ-मृदंगाचा टिपेला पोचलेला आवाज, जोडीला माउलींचा गजर आणि उंचावल्या गेलेल्या हातातील पताका असे दृश्‍य भाविकांनी डोळ्यांत साठवले. तीव्र उन्हाच्या झळा सोसत उभे राहून भाविकांनी पहिल्या उभ्या रिंगणाचा आनंद अनुभवला. दौडत आलेले अश्‍व पालखी रथाजवळ आल्याबरोबर पालखी सोहळ्याच्या वतीने गूळ व हरभऱ्याची डाळ असा खुराक अश्‍वांना देण्यात आला. त्यांच्या गळ्यात हार घातले आणि पुन्हा अश्‍व दौडतच अग्रभागी गेले. उभ्या रिंगणाचा सोहळा पार पडल्यानंतर चोपदाराने रथावर उभे राहून दंड फिरविला आणि सोहळा पुढे मार्गस्थ झाला. माऊलींचा हा दिव्य सोहळा परिसरातील भाविक मोठ्या संख्येने मिळेल त्या वाहनाने रिंगण सोहळा पाहण्यासाठी आले होते. उभे रिंगण पार पडल्यानंतर सोहळा हळुवारपणे माउलींचा गजर करीत विठ्ठलाच्या ओढीने पुढील मुक्‍कामी तरडगावकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी पाच वाजता वैष्णवांचा मेळा तरडगावच्या प्रवेशद्वारावर ग्रामपंचायतच्या वतीने मोठ्या मनोभावे स्वागत करण्यात आले. समाज आरतीनंतर तरडगावी पालखी सोहळा विसावला.