हे संजूचे दुर्भाग्य म्हणावं लागेल; संजू सॅमसनबद्दल के एल राहुल नेमकं काय म्हणाला? वाचा सविस्तर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 23, 2023

हे संजूचे दुर्भाग्य म्हणावं लागेल; संजू सॅमसनबद्दल के एल राहुल नेमकं काय म्हणाला? वाचा सविस्तर

https://ift.tt/rWDJgzd
पार्ल: ‘दांडगा अनुभव गाठीशी नसतानाही भारतीय वनडे संघातील खेळाडूंनी धाडस आणि लढाऊबाणा दाखविला. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेत २-१ असा मालिका विजय नोंदविता आला’, असे गोडकौतुक केले आहे ते बदली कर्णधार लोकेश राहुलने. गुरुवारी निर्णायक तिसऱ्या वनडेत यजमान दक्षिण आफ्रिकेला ७६ धावांनी नमवून भारताने मालिकाविजय निश्चित केला. ज्यात संजू सॅमसनच्या (१०८) संयमी आणि मोक्याच्या क्षणी साकारलेल्या शतकी खेळीचे योगदानही महत्त्वाचे आहे. फक्त भारतच नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेनेही महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देत दुसऱ्या फळीवर जबाबदारी टाकली होती. अर्थात भारताची राखीव फळी सरस ठरली. ‘माझ्या प्रत्येक सहकाऱ्याने संपूर्ण मालिकेत लढाऊबाण्याने खेळ केला आहे. मालिकेच्या सुरुवातीला यातील काही नवोदित अस्वस्थ, घाबरलेले होते. मी त्यांना त्यांचा वेळ द्यायचे ठरविले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट, त्या स्तरावरील दडपण यांच्याशी जुळवून घेण्यासाठी प्रत्येकाला स्वतःचा असा वेळ लागतोच’, असे राहुल म्हणाला. ‘भारतीय क्रिकेट संघात आघाडीच्या क्रमांकावर दिग्गज फलंदाजांचा भरणा आहे. हे संजूचे दुर्भाग्य म्हणावे लागेल; कारण त्यामुळे मला त्याला तिसऱ्या क्रमांकावर संधी देता आली नाही’, असे केएल राहुलने मान्य केले. मात्र मिळालेल्या क्रमांकावर फलंदाजी करत शतक झळकावत भारताला तारणाऱ्या संजू सॅमसनचे विशेष कौतुक करायलाही राहुल विसरला नाही. ‘मला संजूसाठी खूप आनंद वाटतो आहे. गेली कित्येक वर्षे तो आयपीएलमध्ये भरीव कामगिरी करत आहे. आपल्याकडे तिसऱ्या क्रमांकावर यशस्वी, अनुभवी फलंदाज खेळत आहेत. त्यांना डावलून संजूला संधी देता येत नाही. मात्र त्यांच्या अनुपस्थिती मिळालेल्या क्रमांकावरही संजूने संधीचे सोने करून दाखवले’, असे राहुलने सांगितले. संजू सॅमसनने १०८, तर तिलक वर्माने ५२ धावा केल्यामुळे भारताने ८ बाद २९६ धावा केल्या.