
नांदेड: बोळवन सोडून परत गावाकडे येत असताना गाडीचे अचानक टायर फुटल्याने गाडी ३० ते ३५ फूट नदीखाली कोसळली. या गाडीतील दोन तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मुदखेड तालुक्यातील येळी-महाटीच्या पुलावर घडली. थोराजी उर्फ बबलू मारोती ढगे (२५) आणि उद्धव आनंदराव खानसोले (३०) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेनंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बोटीच्या मदतीने गाडी बाहेर काढली. या घटनेने मुदखेड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुदखेड तालुक्यातील शिखांचीवाडी येथील रहिवासी उद्धव खानसोळे आणि त्याचा मित्र थोराजी ढगे हे दोघेजण शुक्रवारी क्रूझर जीप घेऊन लोहा तालुक्यात चिलपिंपरी येथे बोळवन सोडण्यासाठी गेले होते. सायंकाळी ७ च्या सुमारास परत येळीकडे निघाले होते. येळी - महाटी येथील गोदावरी पूलावरून भरधाव वेगाने जात असताना क्रूझर जीपचा अचानक टायर फुटला. घटनेनंतर चालकाच वाहनावरून नियंत्रण सुटलं. जीप पुलावरून गोदावरी नदीत कोसळली. या घटनेचे वृत्त समजताच उस्माननगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार, बीट जमादार निळकंठ श्रीमंगले, पवार यांच्या सह मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सप्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नजीकच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तसेच नांदेड मनपातील अग्निशमन दलाचे दासरी यांनी बोटीच्या सहाय्याने गाडी पाण्याबाहेर काढली. या दुर्घटनेत जीपचालक आणि त्याच्यासोबतच्या युवकाचा मृत्यू झाला. तसेच क्रूझर जीपचेही नुकसान झाले. घटनेदरम्यान नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत थोराजी उर्फ बबलू मारोती ढगे आणि उद्धव आनंदराव ढगे यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मुदखेड येथील शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आले. या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.