मोदींकडून शरद पवारांचा भटकती आत्मा म्हणून उल्लेख, ठाकरेंचा पलटवार, म्हणाले- एक वखवखलेला बुभुक्षित आत्मा... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 1, 2024

मोदींकडून शरद पवारांचा भटकती आत्मा म्हणून उल्लेख, ठाकरेंचा पलटवार, म्हणाले- एक वखवखलेला बुभुक्षित आत्मा...

https://ift.tt/sYfholz
पुणे: ‘तीनशे वर्षांपूर्वी गुजरातमध्ये जन्मलेला आत्मा छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी महाराष्ट्रावर चालून आला होता. त्याचाच एक वखवखलेला बुभुक्षित आत्मा महाराष्ट्रात भटकत आहे,’अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. ‘संयुक्त महाराष्ट्र समिती फोडण्याचे पाप भाजपचा बाप असलेल्या जनसंघाने केले होते,’ असा आरोप त्यांनी ‘महाराष्ट्र दिना’च्या पूर्वसंध्येला केला, तसेच ‘मोदी-शहांच्या हुकुमशाहीच्या कचाट्यात महाराष्ट्र जाऊ देणार नाही,’ असा निर्धारही त्यांनी केला. महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे, पुणे लोकसभा उमेदवार रवींद्र धंगेकर, शिरूर लोकसभा उमेदवार डॉ अमोल कोल्हे आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ वारजे येथे आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदच्चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अनिल देशमुख आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत शरद पवारांवर ‘भटकती आत्मा’ अशी टीका केली होती. त्याला उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिले. ‘सध्या वखवखलेला बुभुक्षित आत्मा महाराष्ट्रात फिरून सभा घेत असून, आपल्या मित्रांची कामे करत आहे. परंतु, त्याच्या नादानपणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यांच्या पत्नीच्या तुटलेल्या मंगळसुत्राकडे या आत्म्याने पाहावे,’ असे उद्धव ठाकरे यांनी मोदींना सुनावले. ‘रेसकोर्स’वर सभा घेणाऱ्या मोदींना झोपेतही घोडेबाजार दिसतो. परंतु, त्यांनी घेतलेले घोडे ही ओझी वाहणारी गाढवे आणि खेचरे असून भाजपचे सध्या ‘चोरा मी वंदिले’ असे चालले आहे,’ असा चिमटाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काढला. ‘लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे तीनशे खासदार निवडून येणार असून, भाजपचे खासदार पुन्हा दोनवर येतील,’ असा दावाही त्यांनी केला. ‘ज्या झाडाच्या अंगाखांद्यावर खेळला, त्याच झाडाचा दांडा कुऱ्हाडीला लावून झाड तोडायला निघाला आहात. परंतु, ज्यांचे बोट धरून चालायला शिकलात, त्या हाताशिवाय एकही पाऊल पुढे टाकता येणार नाही,’ असे उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना ठणकावले. उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी-फडणवीसांच्या मनात महाराष्ट्र द्वेष असून त्यांनी धाराशिवला जाऊनही तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले नाही. राज्यघटना बदलण्यासाठीच भाजपला हवे पाशवी बहुमत, पण घटनेला हात लावला, तर देश पेटून उठेल. एक अकेला सब पे भारी, सोबत सगळे भ्रष्टाचारी अशी भाजपची अवस्था झाली आहे. गद्दारांची टोळी असलेली 'नसली' शिवसेना आणि 'नॅचरल करप्ट पार्टी' सोबत कशी चालते? असा सवाल त्यांनी केला आहे.