
राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात काल जोरदार पावसाने हजेरी लावली. यासोबतच गारपिटीचाही तडाखा बसला. भारतीय हवामान विभागाकडून आजही मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. गारपिटीसह पाऊस होण्याचा अंदाज आहे. आज राज्यातील उर्वरित भागात ढगाळ वातावरण राज्याची शक्यता आहे. धाराशिव, लातूर, पुणे, सातारा, अहिल्यानगर, नाशिक आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला. बाकी उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. आता एप्रिल महिन्याला सुरूवात झाली आहे, पण पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात सतत पाऊस कोसळताना दिसत आहे.
या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्येच आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्टसह पावसाचा येलो अलर्ट जारी केला. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर, सामोडे, चिकसे, देशशिरवाडे, झंझाळे, देगाव, गव्हाणी पाडा, घोडदे आदी परिसरात काल संध्याकाळी झालेल्या बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. कांदा, मका, गहू, टरबूज हरभरा तसेच फळबागा आंबे यांना मोठा फटका बसला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर आज महसूल विभागाने तत्काळ हालचाल करत सामोडे परिसरात पंचनामे करण्यास सुरुवात केली प्रत्यक्ष शेतबांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. सटाणा तालुक्यात अक्षरश: वादळी वाऱ्यासह झालेल्या लिंबू , बोराच्या आकाराच्या गारांनी होत्याचे नव्हते झाले. गहू आडवा झाला तर या भागातील प्रमुख कांदा पिकाला मोठा फटका बसला असून काढणीला आलेला उन्हाळी कांदा नेस्तनाबूत झाला आहे.
उन्हाळी कांदा या भागातील महत्वाचे पिक आहे. त्यावर बळीराजाचे वार्षिक गणिते अवलंबून असतात. उधार उसनवार करून महागडे औषध फवारणी करून त्यांनी पोटाच्या मुलाच्या जिवापाड कांदा जपला होता. त्याला एकरी सत्तर हजार रुपये खर्च आला. आठ ते पंधरा दिवसांनी कांदा काढणीला होता.मात्र गारपिटीने होत्याचे नव्हते झाले. त्यामध्येच आजही हवामान विभागाने मोठा इशारा दिला.