उद्धव ठाकरेंकडे सत्तेचा रिमोट कंट्रोल; सेनेचा भाजपला इशारा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 27, 2019

उद्धव ठाकरेंकडे सत्तेचा रिमोट कंट्रोल; सेनेचा भाजपला इशारा

https://ift.tt/2BLuUFR
मुंबई: मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला कमी जागा मिळाल्या असल्या तरी, सत्तेचा रिमोट कंट्रोल पक्षप्रमुख यांच्या हाती आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेत समान वाटा आणि मुख्यमंत्रिपद पाहिजे, असा आग्रह शिवसेनेनं धरला आहे. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष असून, नेतृत्व आमचेच असणार आहे, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे हे विधान महत्वाचं आहे. २०१४मधील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला कमी जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला ५६ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपनं १०५ जागा जिंकल्या आहेत. २०१४मध्ये भाजपनं १२२ जागा जिंकल्या होत्या. विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपला सहकारी पक्ष शिवसेनेनं 'फिफ्टी-फिफ्टी'च्या फॉर्म्युलाची आठवण करून दिली आहे. तर रविवारी 'सामना' या मुखपत्रातून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. 'रोखठोक' या सदरातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे कौतुक केले आहे. महाराष्ट्रातील निकाल स्पष्ट आहेत. भारतीय जनता पक्षानं १०५ जागा जिंकल्या असून, शिवसेनेनं ५६ जागांवर विजय मिळवला आहे. स्पष्ट बहुमत मिळालं आहे, मात्र युती असतानाही दोन्ही पक्षांना मोठं यश मिळू शकलं नाही. २०१४मध्ये भाजपनं १२२ आणि शिवसेनेनं ६३ जागा जिंकल्या होत्या. प्रचंड धनशक्तीचा सामना केल्यानंतर शिवसेनेला हे यश मिळालं आहे. यावेळी युतीचा पाठिंबा मिळूनही शिवसेनेला ५६ जागा जिंकता आल्या. अपेक्षापेक्षा हा आकडा कमी आहे. मात्र, महाराष्ट्रातील सत्तेचा रिमोट कंट्रोल उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे, असं या सदरात म्हटलं आहे. २०१४ साली भाजपचा वारू उद्धव ठाकरे यांनी रोखला होता. २०१९ साली शरद पवार यांनी तो अडवला. हे सत्य आहे. महाराष्ट्रात युतीला कामापुरते बहुमत मिळाले. पण काँग्रेस-राष्ट्रवादीसारखा मजबूत विरोधकही समोर उभा केला. राजकारणात कोणी कोणाला संपवायचे हा प्रश्न निकाली निघाला, असं राऊत म्हणाले. महाराष्ट्रात विरोधी पक्ष उरणार नाही आणि निवडणुकीनंतर ‘पवार पॅटर्न’ महाराष्ट्रातून कायमचा संपलेला असेल, अशी विधाने भाजपच्या मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांनी केली. ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेला ही भाषा आवडली नाही. तिने एक मजबूत विरोधी पक्ष महाराष्ट्रात उभा केला. याचे श्रेय राज्यातील जनतेला द्यावे लागेल, असंही त्यांनी नमूद केलं. भारतीय जनता पक्षाने मित्रपक्षांसह १६४ जागा लढवल्या. त्यातील १४४ जागा निवडून आणायच्याच अशी एकंदरीत व्यूहरचना होती. शिवसेनेला अडवायचे व विरोधकांना कस्पटासमान लेखून पुढे जायचे ही भूमिका लोकांनी ठोकरून लावली, असं म्हणत त्यांनी भाजपला जोरदार टोला लगावला. काँग्रेस-राष्ट्रवादीतले ‘वतनदार’ विकत घेऊन, प्रसंगी चौकशांचा धाक दाखवून निवडून आणायचे यासाठी आयाराम-गयारामांचा जो बाजार भरवला तो शेअर बाजारासारखा कोसळला. राष्ट्रवादीतून भाजप किंवा शिवसेनेत आलेले बहुतेक मोठे नेते पराभूत झाले व त्यांचा पराभव सामान्य कार्यकर्त्यांनी केला. सातारचे उदयनराजे भोसले यांना यापुढे उडवायला ‘कॉलर’ही शिल्लक ठेवली नाही, इतका दारुण पराभव साताऱ्यात त्यांच्या वाट्याला आला. जनता तुमची गुलाम नाही व तुम्ही स्वतः देवाचे अवतार नाही. शिवरायांनी स्वतःला शेवटपर्यंत स्वराज्याचे सेवक म्हणवून घेतले. त्यांच्या तेराव्या वंशजाला शिवराय समजले नाहीत, हे शेवटी लोकांनी दाखवून दिले. सातारचा पराभव हा ‘आम्ही काहीही करू शकतो, कुणालाही ‘टोप्या’ बदलून पक्षांतर घडवून आणू शकतो’ या अनैतिक विचारांचा पराभव आहे, असंही ते म्हणाले.