
म.टा.वृत्तसेवा, पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर शहराजवळील कर्हे घाटात ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या तीन जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (१० ऑक्टोबर) मध्यरात्री घडली आहे. गणेश सुखदेव दराडे (वय-२९) रा. कर्हे, श्रीकांत बबन आव्हाड (वय-२८) रा. दरेवाडी हे दोघे संगमनेर तालुक्यातील असून अजय श्रीधर पेदाम (वय-२७) हा रा. पांजरे, ता. चंद्रपूर येथील आहे. पुणे नाशिक महामार्गावरील नांदुर-शिंगोटे वरून संगमनेरच्या दिशेने जात असताना कर्हे घाटात कार (एमएच.१९, बीजी ८१११) पुढे चाललेल्या ट्रकला (एमएच.१२, केपी १७९९) पाठीमागून धडकली. अपघात इतका भीषण होता की, कारमधील तिनही युवकांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी, पोलीस हवलदार रफिक पठाण, तालुका पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत कारमधील तिघा युवकांना बाहेर काढलं. या भीषण अपघातामुळे पुणे -नाशिक महामार्गावरील वाहतूक मध्यरात्री बऱ्याचवेळ विस्कळीत झाली होती.