या तीन चेंडूत मुंबईकर शिवम दुबे ठरला किंगमेकर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 11, 2019

या तीन चेंडूत मुंबईकर शिवम दुबे ठरला किंगमेकर

https://ift.tt/2Kb4VMt
नागपूर : वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या हॅट्ट्रिकने नागपूरच्या मैदानात इतिहास रचला. त्याने केवळ ७ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या आणि भारतीय संघाला विजयही मिळवून दिला. भारताने यासोबतच तीन सामन्यांची टी-२० मालिका २-१ ने खिशात घातली. या सामन्यात आणखी महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे मुंबईकर गोलंदाज शिवम दुबेने. बांगलादेशचा सर्वात सेट फलंदाज त्याने माघारी पाठवला आणि भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. युवा गोलंदाज सुरुवातीला विकेट्ससाठी संघर्ष करताना दिसून आला. मात्र त्याने बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज मुश्फिकुर रहिमला पहिल्याच चेंडूत माघारी पाठवलं. १४ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर शिवमने हा महत्त्वाचा फलंदाज माघारी पाठवल्यानंतर १६ व्या षटकात कर्णधार रोहित शर्माने पुन्हा शिवम दुबेवर विश्वास दाखवला आणि त्याने तो सार्थ ठरवला. बांगलादेशकडून स्फोटक फलंदाजी करत असलेला मोहम्मद नईम हा शिवम दुबेचा दुसरा बळी ठरला. नईमला ८१ धावांवर माघारी पाठवल्यानंतर दुबेने पुढच्याच चेंडूवर अफिफ हुस्सैनला खातंही उघडण्याची संधी दिली नाही. हॅट्ट्रिकची संधी हुकली असली तरी या तीन चेंडूतच शिवम दुबेने त्याची महत्त्वाची भूमिका बजावली. वाचा : शिवम दुबेने ४ षटकात ३० धावा दिल्या आणि महत्त्वपूर्ण अशा तीन विकेट्स घेतल्या. बांगलादेशचा युवा फलंदाज मोहम्मद नईम खेळत असलेली निर्भय खेळी पाहून भारतीय चाहत्यांची चिंता वाढली होती. कारण, नईमने फक्त ४८ चेंडूत ८१ धावा केल्या. शिवम दुबेने सलग दोन चेंडूत दोन विकेट्स घेऊन मोलाचं योगदान दिलं. दीपक चहरची हॅट्ट्रिक दीपक चहर या वर्षात हॅट्ट्रिक घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. २०१९ मध्ये सर्वात अगोदर मोहम्मद शमीने अफगाणिस्तानविरुद्ध हा विक्रम केला होता. विश्वचषकातील सामन्यात शमीने हॅट्ट्रिक घेऊन भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर जसप्रीत बुमराने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत हॅट्ट्रिक नोंदवली आणि आता टी-२० मध्ये दीपक चहरने नवा विक्रम केला. वाचा : तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत बांगलादेशने विजयी सलामी दिली होती. मात्र त्यानंतर भारतीय संघाने पुनरागमन करत सलग दोन विजय मिळवले आणि मालिका खिशात घातली. नागपुरातील सामन्यात भारताने ५ बाद १७४ धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशचा डाव १९.२ षटकांमध्येच १४४ धावांवर आटोपला.