भारतीय बालकांना हवामान बदलाचा मोठा धोका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 15, 2019

भारतीय बालकांना हवामान बदलाचा मोठा धोका

https://ift.tt/2QmrnWO
वृत्तसंस्था, नवी दिल्ली जागतिक तापमानवाढीमुळे हवामानात होत असलेल्या बदलांचा सर्वाधिक फटका जगभरातील विशेषत: भारतीय बालकांना अधिक प्रमाणात बसेल, असे ‘लॅन्सेट’ या विज्ञानपत्रिकेतील एका अहवालात म्हटले आहे. जीवाश्म इंधनाचा वापर तातडीने कमी न केल्यास पुढील पिढ्यांना अन्नाचा तुटवडा, रोगांचा वाढता संसर्ग, पूर, जीवघेण्या उष्णतेच्या लाटा यांना तोंड द्यावे लागू शकते, असे अहवालात म्हटले आहे. आरोग्य आणि हवामानातील बदल या विषयावर ‘लॅन्सेट’मध्ये दरवर्षी व्यापक मूल्यमापन अहवाल प्रसिद्ध केला जातो. जगातील कार्बन उत्सर्जन आणि हवामानातील बदल अशाच गतीने सुरू राहिल्यास आज जन्माला येणारी बालके ७१ वर्षांची होतील, तेव्हा जगाचे तापमान ४ अंश सेल्सिअसने वाढलेले असेल. त्यामुळे त्यांच्या जीविताला प्रत्येक टप्प्यावर धोका असेल, अशी भीती या अहवालात वर्तविण्यात आली आहे. जगभरातील ३५ संस्थांतील १२० तज्ज्ञ एकत्र येऊन हा अभ्यास करतात आणि अहवाल तयार करतात. यामध्ये जागतिक बँक आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींचाही समावेश असतो. पॅरिस करारात ठरल्यानुसार तापमानवाढ दोन अंशांपर्यंत मर्यादित न ठेवल्यास भावी पिढ्यांचे आरोग्य उत्तम स्थितीत राहणे कठीण आहे, असेही अहवालात म्हटले आहे. सर्वसाधारण परिणाम - उष्णता लाटांमुळे बालकांना अतिसाराची लागण झपाट्याने होईल. - सध्या अतिसार हे बालमृत्यूचे एक प्रमुख कारण - २०१५मध्ये उष्माघातामुळे भारतात हजारो जणांचे बळी - गेल्या ५० वर्षांत आरोग्याच्या क्षेत्रात जे काही कमावले ते काही वर्षांतच गमावण्याची भीती - भविष्यात तापमानवाढीमुळे पिकांअभावी अन्नसुरक्षा धोक्यात येण्याची भीती आरोग्याला धोका वैश्विक तापमानवाढीचा सर्वाधिक फटका अर्भके आणि बालकांना बसेल. कुपोषण आणि त्याच्याशी संबंधित आरोग्य समस्या, उदा. वाढ खुरटणे, कमकुवत रोगप्रतिकार शक्ती, वाढीतील दीर्घकालीन समस्या आदी उद्भवू शकतात. डेंग्यूसारख्या आजारांची लागण बालकांना लवकर होईल. फुफ्फुसांची क्षमताच क्षीण झाल्यामुळे दम्यासारखे आजार आणि त्यातून हृदयविकार, पक्षाघाताचा धोका वाढेल. अशी व्हावी उद्दिष्टपूर्ती- जागतिक तापमानवाढ १.५ अंशांपर्यंतच रोखणे हे जागतिक उद्दिष्ट - ते साध्य करण्यासाठी २०१९ ते २०५० या काळात जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण दरवर्षी ७.४ टक्क्यांनी कमी करण्याखेरीज पर्याय नाही. २०१६मध्ये ५ लाख अकाली मृत्यू कोळशाच्या वापरामुळे होणाऱ्या मृत्यूंकडेही अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. भारतात सन २०१६मध्ये वायू प्रदूषणामुळे पाच लाख अकाली मृत्यू झाले. यातील ९७,४०० मृत्यू कोळशामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे झाले आहेत. सन २०१६ ते २०१८ या काळात भारतात कोळशापासून होणाऱ्या वीजनिर्मितीत ११ टक्के वाढ झाली आहे. पीएम २.५ या घातक प्रदूषितकणांमुळेच त्यावर्षी ५ लाख २९ हजार मृत्यू ओढवले.