देशात जनमताच्या अपहरणाचं युग: प्रियांका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 25, 2019

देशात जनमताच्या अपहरणाचं युग: प्रियांका

https://ift.tt/2KRc3Ou
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या घडामोडी व फोडाफोडीवरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. 'जनादेशाच्या खुल्या अपहरणाच्या युगात आपण पोहोचलो आहोत की काय?,' असा सवाल प्रियांका यांनी केला आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार येणार असं वाटत असतानाच भाजपनं रातोरात अजित पवारांना फोडून नव्या सरकारचा शपथविधी घडवून आणला. त्यामुळं राज्याच्या सत्ताकारणाला कलाटणी मिळाली. भाजपनं लोकशाही संस्थांचा गैरवापर करून हे सगळं केल्याची टीका विरोधी पक्षांकडून होत आहे. यांनीही ट्विटरच्या माध्यमातून या प्रकारावर भाष्य केलं आहे.

'भाजपनं महाराष्ट्रात देशाची राज्यघटना व घटनात्मक संस्थांना ठेंगा दाखवून कर्नाटकातील सत्तेच्या खेळाची पुनरावृत्ती सुरू केली आहे, असं टीव्हीवर पाहायला मिळतं आहे. महाराष्ट्रात १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्यासाठी सरकारच्या खिशातून कधी मदत निघाली नाही, याकडं त्यांनी लक्ष वेधलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते आज आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचंही समजतं. महाराष्ट्र विधानसभेत तातडीने विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा आदेश मिळवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडीनं सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. या निर्णयाकडं आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.