नवी दिल्ली: अफगाणिस्तानहून दिल्लीत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पदाफार्श झाला आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सात जणांना अटक करण्यात आली आहे. या सातजणांच्या पोटातून तब्बल १७७ हेरॉइनच्या कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत. या कॅप्सूल पोटातून बाहेर काढण्यासाठी तब्बल १० डझन केळी आरोपींना खाण्यास दिली होती. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. विमानतळावर अधिकाऱ्यांनी या आरोपींची झडती घेतली. त्यांच्याजवळ काहीच न आढळल्यामुळे त्यांची स्कॅनिंग आणि एक्स-रे काढण्यास पाठवले. याचे अहवाल आल्यानंतर अधिकाऱ्यांना धक्काच बसला. या सातही जणांच्या पोटात अंमली पदार्थाच्या कॅप्सूल आढळून आल्या. या कॅप्सूल पोटातून बाहेर काढण्यासाठी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल १० डझन केळी आरोपींना खाऊ घातली. त्याशिवाय, अन्य दोनजणांनाही अटक करण्यात आली असून हे दोघे भारतात राहणारे आहेत. हे दोघेजण रिसीव्हर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पोटात गोळ्या गेल्या कशा? मध आणि एका विशिष्ट प्रकारच्या तेलाच्या मदतीने या गोळ्या पोटात ढकलण्यात आल्या. आरोपींनी अफगाणिस्तान ते दिल्ली दरम्यानच्या प्रवासात काहीच खाल्ले नाही. दिल्लीत आल्यानंतर हॉटेलमध्ये गेल्यावर या कॅप्सूल पोटातून बाहेर काढण्याचे त्यांचे नियोजन होते. डॉक्टरांनी आरोपी रहमतुल्लाहच्या पोटातून २८ कॅप्सूल, फैजकडून ३८. हबीबुल्लाह आणि वदूद यांच्याकडून १५, अब्दुल हमीदकडून १८, फजल अहमदकडून ३७ आणि नूरजई कबीरकडून २६ कॅप्सूल जप्त केल्या.