
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत शानदार विजय प्राप्त केल्यानंतर आता पुन्हा एकदा आम आदमी पक्षाच्या आकांक्षांना पंख फुटलेत. या विजयामुळे पक्षात आलेल्या उत्साहामुळे पक्षानं देशभर जाळं पसरवण्याचा निर्णय जाहीर केलाय. आपचे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पक्ष सकारात्मक राष्ट्रवादासोबत आपल्या विस्ताराचा पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे. याचसंबंधी चर्चा करण्यासाठी पक्षानं रविवारी राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक बोलावलीय. आपचे प्रमुख यांच्याजवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात पक्ष पंजाबसहीत आणखी काही राज्यांत विधानसभा निवडणूक लढण्याचाही विचार करत आहे. मोठ्या प्रमाणात नव्या स्वयंसेवकांना पक्षात सहभागी करणं आणि पक्षाच्या राष्ट्रीय विस्तार करणं, हा रविवारी होणाऱ्या बैठकीचा मुख्य हेतू असल्याचं समजतंय. मागच्या केजरीवाल सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या गोपाल राय यांनी जनतेला ९८७१०१०१०१ या क्रमांकावर मिस कॉल देऊन 'आप'च्या 'राष्ट्र निर्माण अभियाना'शी जोडण्याचं आवाहन केलं आहे. या अभियानाद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचं काम आम आदमी पक्षाचे नेते करणार आहेत. पक्ष मध्य प्रदेश आणि गुजरातसहीत देशभर स्थानिक निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. दिल्लीतही प्रेम आणि सन्मानावर आधारीत सकारात्मक राष्ट्रवादाचा प्रसार पक्षाकडून केला जाणार आहे, असं गोपाल राय यांनी स्पष्ट केलं.