मालेगाव, मुंबईतून घुसखोरी; नाशिकच्या सीमेवर एसआरपीएफ नेमा: महापौर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 7, 2020

मालेगाव, मुंबईतून घुसखोरी; नाशिकच्या सीमेवर एसआरपीएफ नेमा: महापौर

https://ift.tt/2zfAeTJ
नाशिक: मुंबई आणि मालेगावमधून अनेक लोक राजरोसपणे आणि छुप्या पद्धतीने नाशिकमध्ये घुसखोरी करत आहेत. करोनाची सर्वाधिक संख्या असलेल्या शहरातून हे लोक येत असल्याने नाशिकमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नाशिकच्या सीमेवर एसआरपीएफच्या जवानांना तैनात करून ही घुसखोरी थांबवा, अशी मागणी नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही मागणी केली. मुंबई आणि मालेगावमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तिथले लोक नाशिकमध्ये येत आहेत. चांदवडपासून नाशिकपर्यंत कोणीही सहज शहरात येऊ शकतो. त्यांना कुणाकडूनही अटकाव केला जात नाही. त्यामुळे हे शहर सुद्धा बाधित होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये करोना नियंत्रणात आहे, मात्र बाहेरून लोक येत राहिल्यास नाशिकमध्येही परिस्थिती हाताबाहरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरांच्या सीमेवर पोलिसांसोबतच एसआरपीचे जवान तैनात केले पाहिजे, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली. याप्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी प्रशासनात समन्वयाचा अभाव असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. नाशिकमध्ये करोनाबाधितांची तपासणी करण्यासाठी लॅब सुरू करण्यात आली आहे. मात्र या लॅबचा रिपोर्ट येण्यासाठीच ४ ते ५ दिवस लागत आहेत. शहरात लॅब असूनही रिपोर्टसाठी चारपाच दिवस जात असतील तर त्या रिपोर्टचा काय उपयोग? असा सवाल करतानाच याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात करोनाचे एकूण ७२ रुग्ण आहेत. सुदैवाने नाशिकमध्ये करोनाने अद्याप एकाचाही मृत्यू झालेला नाही. तर मालेगाव पालिका हद्दीत ३९१ करोनाबाधित असून या ठिकाणी आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच नाशिकच्या महापौरांनी मालेगावमधून नाशिकमध्ये होणाऱ्या घुसखोरीवर चिंता व्यक्त केली आहे.