गेल्या ५ दिवसांत सोडल्या ७० विशेष ट्रेन, मजुरांसह ८० हजार लोक परतले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 6, 2020

गेल्या ५ दिवसांत सोडल्या ७० विशेष ट्रेन, मजुरांसह ८० हजार लोक परतले

https://ift.tt/3fvaRy7
नवी दिल्ली: विविध राज्यांमध्ये अडकलेले मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि यात्रेकरूंना आपापल्या राज्यांमध्ये पाठवण्यासाठी रेल्वेने ७० विशेष ट्रेन सोडल्याचे रेल्वेने म्हटले आहे. या ७० विशेष ट्रेनद्वारे ८० हजार नागरिकांना सोडण्यात आले आहे. सोमवारपर्यंत एकूण ५५ ट्रेनने आपली पहिली फेरी पूर्ण केली किंवा प्रवास सुरू केला, तर आणखी ३० ट्रेन मंगळवारी सोडण्यात आल्या असे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले. या ट्रेन बेंगळुरू, सुरत, साबरमती, जालंधर, कोटा आणि एर्नाकुलम येथून सोडण्यात आल्या. प्रत्येक ट्रेनमध्ये हजारच्या आसपास प्रवासी होते. त्या-त्या राज्यांनी रेल्वेकडे ट्रेन सोडण्याची विनंती केल्यानंतर रेल्वे प्रशासन आणखी ट्रेन सोडेल, असेही रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले. अशा प्रकारच्या आणखी ५०० ट्रेन रेल्वे सोडू शकते असेही अधिकारी पुढे म्हणाला. दरम्यान, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, गुजरात, तेलंगण आणि आंध्र प्रदेशात गेलेल्या किंवा तेथून सुटलेल्या ट्रेनच्या प्रवाशांचे प्रवासभाडे केंद्र सरकार भरणार की राज्य सरकार किंवा कसे याबाबतचा मुद्दा उपस्थित झाल्याचेही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांनी येणाऱ्या आणि जणाऱ्या ट्रेनचे भाडे आम्ही भरणार असल्याचे सांगितले आहे. तर, झारखंड आणि बिहार राज्यांनी राज्यात येणाऱ्या ट्रेनचेच भाडे देण्याची तयारी दाखवली आहे, असे अधिकारी म्हणाला.