कोकणात गणेशोत्सवासाठी येताय?; मोहन जोशी यांनी चाकरमान्यांना केलं 'हे' आवाहन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 31, 2020

कोकणात गणेशोत्सवासाठी येताय?; मोहन जोशी यांनी चाकरमान्यांना केलं 'हे' आवाहन

https://ift.tt/39Igy97
मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात या, दणक्यात उत्सव साजरा करा. हरकत नाही. पण कोकणात आल्यावर सरकारने सांगितलेल्या सूचनांचं पालन करा. येताना करोनाची चाचणी करून घ्या आणि करोना नसल्याचं प्रमाणपत्र घेऊनच सोबत या, असं आवाहन ज्येष्ठ अभिनेते यांनी केलं आहे. राज्यातील करोनाच्या पार्श्वभूमीवर मोहन जोशी यांनी हे आवाहन केलं आहे. मी सुद्धा रायगडचा रहिवासी आहे. त्यामुळे मला कोकणाची काळजी वाटते. सध्या इकडे कोकणात करोनाचा एवढा प्रादुर्भाव नाही. कोकणातील लोक काळजी घेत असल्याने करोना नियंत्रणात आहे आणि कोकणात हा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आणखी खबरदारी घेण्याची गरज आहे. मुंबईतून अनेक चाकरमानी कोकणात येणार आहेत. त्यामुळे त्यांना कोकणात आल्यावर मास्क लावायला सांगा. सॅनिटायझेशनचा वापर करायला सांगा, सोशल डिस्टन्सिंगसह शासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करायला सांगा. कोकणवासीय या सर्व गोष्टी करत आहेत. त्यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांनीही या गोष्टींचं पालन करायला हवं. करोनाचा प्रादुर्भाव वाढू द्यायचा नसेल तर हे केलंच पाहिजे, असं सांगताना येताना करोना नसल्याचं प्रमाणपत्रं घेऊनच या, असं मोहन जोशी यांनी म्हटलं आहे. गणेशोत्सवाच्या काळात करोनाचा संसर्गाचा फैलाव झाला तर सर्वांनाच त्रास होईल. त्यामुळे हा संसर्ग पसरू न देणं हे आपल्याच हाती आहे. त्यासाठी सरकारने दिलेल्या सूचनांचं पालनं करणं हाच एकमेव पर्याय आहे. असं सांगतानाच तुमचं कोकणात स्वागत आहे. कोकणात या, उत्साहात आणि जोरात पण सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून साजरा करा, असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राज्यात करोना संसर्गाचा वेग वाढत असून, काल ११ हजार १४७ इतक्या उच्चांकी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ११ हजार ७१९ वर पोहोचली आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात २६६ जणांचा मृत्यू झाल्यानं बळींची एकूण संख्या १४ हजार ७२९ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ आहे. काल आठ हजार ८६० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं एकूण २ लाख ४८ हजार ६१५ रुग्ण करोनावर मात करुन सुखरुप घरी परतले आहेत. त्यामुळं राज्याचा रिकव्हरी रेट एक टक्क्यानं वाढून ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात सध्या १ लाख ४८ हजार १५० अॅक्टिव्ह रुग्ण असून राज्यातील विविध रुग्णालयांत ते सध्या उपचार घेत आहेत. तसंच, कालपर्यंत तपासण्यात आलेल्या २० लाख ७० हजार १२८ चाचण्यांपैकी ४ लाख ११ हजार ७९८ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, सध्या ९ लाख ०४ हजार १४१ जण होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, ४० हजार ५४६ व्यक्ती संस्थांत्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.