पुणे: संपूर्ण देशात करोनाचा कहर निर्माण झाला असून त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा टीका केली आहे. परदेशातून येणाऱ्या लोकांना रोखण्याची गरज असताना मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात घेऊन आले. त्यामुळे मोदींनीच भारतात करोना आणला असं म्हटलं तर चुकलं कुठं?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून हा सवाल केला आहे. जेव्हा परदेशातून येणाऱ्या लोकांना रोखण्याची आणि त्यांची टेस्टिंग करण्याची गरज होती. नेमके त्याचवेळी पंतप्रधान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या लवाजम्याला बोलावून राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोदींनीच भारतात करोना आणला असं म्हटलं तर चुकलं कुठे?, असा सवाल आंबेडकर यांनी केला आहे. त्यामुळे आंबेडकर यांच्या या टीकेला भाजप काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, आंबेडकर यांनी मोदी हे धार्मिक गटाचे नेते असून त्यांच्यात राजकीय नेतृत्वाची धमक नसल्याची टीका केली होती. राजकीय नेतृत्वाची धमक नसल्याने करोनाच्या संकटातून बाहेर येण्याची मोदींकडे दूरदृष्टी नसल्याचा घणाघातही त्यांनी केला होता. औरंगाबाद मुक्कामी त्यांनी ही टीका केली होती. डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी आणि पोलिसांसह इतर कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर देशातील करोना आटोक्यात आला आहे. डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांच्या परिश्रमांमुळे करोनावर मात करता आल्याचा संदेश सरकारने द्यायला पाहिजे होता. मात्र सरकारने तसे केले नाही. आजही केवळ ५ टक्के रुग्णांसाठी ९५ टक्के जनतेला वेठीस धरण्याचं काम सुरू आहे, ते योग्य नाही, असं सांगतानाच भविष्यात आर्थिक संकटाने वंचित घटकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणूनच आम्ही नाकारला असल्याचंही ते म्हणाले होते. अर्थव्यवस्थेला खिळ बसली असून तिला रुळावर आणण्याची जबाबदारी सरकारची आहे. किमान आता लोकांनी स्वत:ला वाचवण्यासाठी जनजीवन सुरू करावे, असे आंबेडकर म्हणाले. बकरी ईद, रक्षाबंधन, अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करावी. किमान रक्षाबंधनाच्या दिवशी सरकारने सार्वजनिक वाहतूक सुरू करावी, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. १ ऑगस्टला नागरिकांनी स्वत:ला आवडणाऱ्या पक्षाचा झेंडा गॅलरीत फडकवावा. हा केंद्र व राज्य सरकारला जनतेचा इशारा असेल असे त्यांनी नमूद केले होते.