भाजपमध्ये गेलेल्या आमदारांची घरवापसी होणार!; नवाब मलिकांचा मोठा खुलासा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 10, 2020

भाजपमध्ये गेलेल्या आमदारांची घरवापसी होणार!; नवाब मलिकांचा मोठा खुलासा

https://ift.tt/2PGmkyR
मुंबई: राष्ट्रवादीचे १२ आमदार फुटणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते यांनी खुलासा केला आहे. राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटणार नाही, असं सांगतानाच उलट राष्ट्रवादीमध्येच काही आमदार प्रवेश करण्यासाठी अतूर आहेत, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या या दाव्यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करून हा खुलासा केला आहे. काही लोक राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची अफवा पसरवत आहेत. या वृत्तात काहीही तथ्य नसून खोटे वृत्त पसरविले जात आहे. उलट निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेले आमदार आता राष्ट्रवादीत यायला अतूर आहेत. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. लवकरच त्याबाबतची माहिती सर्वांना दिली जाणार आहे, असं मलिक यांनी म्हटलं आहे. दरम्यान, कर्नाटक, मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही भाजपकडून ऑपरेशन लोट्स सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये हे ऑपरेशन लोट्स होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावरून शिवसेनेने भाजपवर टीकास्त्र सोडलेलं आहे. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असं आव्हान शिवसेनेने भाजपला दिलं होतं. तर आमदार फुटले तरी तीन पक्षांच्या ताकदीसमोर फुटलेला आमदार निवडून येणारच नाही, असा दावा राष्ट्रवादीने केला होता. भाजपनेही या टीकांचा समाचार घेतला असून आम्हाला सरकार पाडण्यात कोणताही रस नाही. राज्यात कोणतंही ऑपरेशन लोट्स होणार नसल्याचं भाजपने स्पष्ट केलंय. सरकार पडायचं तेव्हा पडेल. पण आधी ते चालून दाखवा, असं आव्हानही भाजपने शिवसेनेला दिलं आहे. करोनावरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच ऑपरेशन लोट्सचा मुद्दा पुढे केला जात असल्याचं सांगतानाच या सरकारमध्ये समन्वय नाही. त्यात अंतर्विरोध आहे. या अंतर्विरोधानेच हे सरकार कोसळेल, असा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे राज्यातील १२ आमदार फुटण्याच्या सुरू असलेल्या अफवा आणि राष्ट्रवादीतच भाजपचे आमदार येणार असल्याचा राष्ट्रवादीकडून करण्यात येत असलेला दावा, या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.