नवी दिल्ली: राजधानी नवी दिल्लीत पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर मुंबईत आलेली व्यक्ती लाइव्ह करताना गळफास घेत होती. त्याचवेळी आयर्लंडमधील फेसबुकच्या महिला अधिकाऱ्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स यंत्रणेच्या माध्यमातून सुसाइट अॅलर्ट मिळाला. त्यांनी याबाबत तातडीने पोलिसांना माहिती दिली. दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांशी संपर्क केला. मुंबई पोलिसांनी या व्यक्तीचा जीव वाचवला. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलचे डीसीपी अन्येष रॉय यांनी सांगितले की, शनिवारी रात्री साधारण आठ वाजता फेसबुकमधील महिला अधिकाऱ्याचा आयर्लंडमधून फोन आला. त्यांनी इमेल पाठवला होता. फेसबुक अकाउंटशी संबंधित माहिती, मोबाइल नंबर आदी दिले. हे अकाउंट दिल्लीच्या एका महिलेच्या नावाने होता. फेसबुकवर मोबाइल क्रमांकही नोंदवलेला होता. पोलिसांनी मोबाइल क्रमांकाच्या आधारे या महिलेच्या घराचा पत्ता शोधला. तो पूर्व दिल्लीतील मंडावली परिसराचा होता. सायबर सेलने पूर्व दिल्लीचे डीसीपी जसमित सिंह यांना सर्व माहिती दिली. पूर्व दिल्लीतील पोलीस काही वेळातच या महिलेच्या घरी पोहोचले. पोलिसांनी महिलेकडे चौकशी केली असता, मोबाइल नंबर माझा असला तरी, अकाउंट पतीचा आहे. तो सध्या मुंबईत आहे, असे तिने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलचे अधिकारी बाल सिंह राजपूत आणि डॉ. करंदीकर यांनी करणाऱ्या व्यक्तीशी फोनवरून संपर्क साधला आणि त्याची समजूत काढून त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे या व्यक्तीचे लोकेशन ट्रेस करत भाईंदर परिसरात पोहोचले. तेथे पोलिसांनी या व्यक्तीची समजूत काढली. त्यानंतर त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. पत्नीशी भांडण झाल्यानंतर आला होता मुंबईत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती १४ दिवसांपूर्वी पत्नीशी भांडण झाल्यानंतर मुंबईत आला होता. तेथे एका हॉटेलात काम करत होता. मुंबईत तो कुठे राहतो याबाबत पत्नीला काहीच माहीत नव्हते. फक्त त्याचा मोबाइल नंबर तिच्याकडे होता. त्याच्या मदतीने मुंबई पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि त्याचा जीव वाचवला.