मुंबई: उपनगरी लोकलसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी लोकल प्रवास करून आंदोलन करणारे नेते , संतोष धुरी, गजानन काळे आणि अतुल भगत यांना रेल्वे पोलिसांनी कर्जत चारफाटा येथे अटक केली. मनाई आदेश असताना मनसे नेते आणि कार्यकर्त्यांनी लोकलमधून प्रवास करत सविनय कायदेभंग आंदोलन केलं होतं. या प्रकरणी मनसेचे सरचिटणीस देशपांडे, नेते संतोष धुरी, अतुल भगत आणि गजानन काळे यांच्याविरोधात कर्जत लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हे चौघेही कर्जत चारफाटा येथे येणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रेल्वेच्या गुन्हे शाखेच्या ठाणे युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून चारही नेत्यांना अटक केली. त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी कर्जत रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या काळात खबरदारीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुंबईतील लोकलसेवा बंद आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचा ताण इतर वाहतूक सेवेवर पडत आहे. बसमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे करोना संसर्ग रोखण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करून मनसेने लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यासाठी रेल्वे प्रशासनाला मुदतही दिली होती. मात्र, रेल्वे प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केल्याचा निषेध म्हणून लोकलमधून प्रवास करून मनसे नेत्यांनी सविनय कायदेभंग आंदोलन केले. मनसे नेते देशपांडे यांच्यासह गजानन काळे, धुरी, भगत यांनी लोकलमधून प्रवास केला. मनाई आदेश असताना या नेत्यांनी लोकलमधून प्रवास केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.