श्रीगोंदाजवळ मालगाडी घसरली; दौंड-मनमाड वाहतूक विस्कळीत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 23, 2020

श्रीगोंदाजवळ मालगाडी घसरली; दौंड-मनमाड वाहतूक विस्कळीत

https://ift.tt/37MZHTz
म.टा. प्रतिनिधी, नगर: मनमाड-दौंड रेल्वेमार्गावरील श्रीगोंदा रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी पहाटे मालगाडीचे १२ डबे घसरले. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, यामुळे रेल्वेरुळांचे मोठे नुकसान झाले असून या मार्गावरून धावणाऱ्या पाच गाड्या पुणेमार्गे वळविण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दौंडकडून मनमाडकडे ४२ डबे असलेली मालगाडी सिमेंट घेऊन जात होती. पहाटे नगर जिल्ह्यातून जात असताना श्रीगोंदा ते बेलवंडी स्टेशनच्या दरम्यान गाडीचे बारा डबे रुळावरून घसरले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली. वेळापत्रकानुसार धावत असलेल्या गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना पुढे जाण्यास उशीर होणार आहे. अपघात झाला तेव्हा या मार्गावरून धावत असलेल्या गाड्या जवळच्या स्थानकांत थांबविण्यात आल्या होत्या. पहाटे या अपघाताची माहिती रेल्वे प्रशासनासोबतच बेलवंडी व श्रीगोंदा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. रेल्वेमार्ग दुरुस्त होण्यास वेळ लागणार असल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक बऱ्याच वेळेसाठी ठप्प राहणार आहे. हा अपघात नेमका कसा झाला, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली. रेल्वेने दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. विविध ठिकाणांहून अधिकारी आणि मदत पथके घटनास्थळाकडे रवाना झाली आहेत.