म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरीही शहरातील काही भागांतील सांडपाण्यामध्ये करोना विषाणूचे अंश सापडले आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने () ११ ते २२ मे २०२० या कालावधीत गोळा केलेल्या नमुन्यांच्या अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे. त्यात धारावीसह सहा विभागांतील सांडपाण्याच्या नमुन्यांचा समावेश आहे. मात्र, या प्रकारे सांडपाणी वा गटाराच्या पाण्यात करोनाचे संसर्ग आढळल्यास मानवाला कोणताही धोका नसल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबईत मार्च अखेरीपासून करोना संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणात सुरू झाला. त्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरने ११ ते २२ मे या कालावधीत मुंबईतील धारावी, कुर्ला, शिवाजीनगर, मालाड, कांजुरमार्ग, वडाळा अशा सहा विभागांतील सांडपाण्यातील नमुने गोळा करून त्यांचे शास्त्रीय पृथक्करण केले. त्या अहवालातील निष्कर्ष मुंबईकरांसाठी धडकी भरविणारे आहेत. करोनाचे विषाणू सांडपाण्यातही सापडल्याने सारेच आश्चर्यचकित झाले आहेत. मार्चमध्ये गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये असे कोणतेही विषाणू आढळले नव्हते. यासंदर्भात मुंबई पालिका अधिकाऱ्यांनी सांडपाण्यात आढळणारे विषाणू मानवी जीवास धोकादायक नसल्याचे नमूद केले आहे. सांडपाण्यात सापडणाऱ्या विषाणूचा मानवाशी थेट संपर्क येत नसल्याचेही सांगण्यात येते. सांडपाणी हे विनाप्रक्रिया समुद्रात जात असल्याने कोणताही धोका निर्माण होत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पालिका कर्मचाऱ्यांना धोका नाही! मलनि:सारण प्रक्रिया केंद्रातील कर्मचाऱ्यांनाही तसा कोणताही धोका निर्माण होणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. पालिका कर्मचाऱ्यांची नियमित पद्धतीने करोना तपासणी होत असते. त्यामुळे वेळीच उपाय करता येत असल्याचे अधिकारी स्पष्ट करतात. तसेच, सांडपाणी वापरात येत नसल्याने मुंबईकरांना कोणताही धोका नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.