
म. टा. वृत्तसेवा, बुलडाणा 'विद्यालक्ष्मी पोर्टलवर मिळविण्यासाठी केलेला अर्ज फेटाळला गेला आहे. वडिलांनी आधीचे पीककर्ज न भरल्याने नवे कर्ज मिळू शकत नसल्याचे बँक सांगते. त्यामुळे माझे भविष्यच अंधारात सापडले आहे. येत्या दहा दिवसांत शैक्षणिक कर्ज द्या, अन्यथा होईन', असे खळबळजनक पत्र संग्रामपूर तालुक्यातील वैभव मानखैर या विद्यार्थ्याने मुख्यमंत्री यांना पाठविले आहे. शिक्षणासाठी झटणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या वाट्याला येणाऱ्या अडचणी या पत्राने पुन्हा एकदा अधोरेखित केल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्याच्या आदिवासीबहुल संग्रामपूर तालुक्यातील काकोडा गावात राहणाऱ्या बाबाराव मानखैर यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा प्रसाद हा शेतीत वडिलांना मदत करतो. लहान मुलगा वैभव हा धुळे जिल्ह्यातील बोराडी येथील फार्मसी कॉलेजात दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. बारावीनंतर जवळ असलेल्या पैशाच्या बळावर वडिलांनी वैभवला फार्मसी शिक्षणासाठी पाठविले. पहिल्या वर्षी वैभवला गुणही चांगले मिळाले. यावर्षी शेतात काही पिकलेच नाही. जवळ पैसा नसल्याने दुसऱ्या वर्षाचे शिक्षण थांबण्याची वेळ आली. तसे होऊ नये म्हणून वैभवने संग्रामपूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत शैक्षणिक कर्जासाठी चार महिन्यांपूर्वी अर्ज केला. कर्ज मिळावे म्हणून बँकेचे अनेकदा उंबरठे झिजविले. मात्र पदरी उपेक्षाच पडली. 'तुमच्या वडिलांनी घेतलेले पीककर्ज न भरल्याने तुम्हाला शैक्षणिक कर्ज देऊ शकत नाही,' असे स्पष्टीकरण देणारे पत्र बँकेने वैभवच्या हातात दिले. या प्रतिसादाने उद्विग्न झालेल्या वैभवने २३ डिसेंबरला थेट मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहिले. आत्महत्येची परवानगी द्या. ती दिली नाही तर माओवादी होण्यावाचून पर्याय नसल्याचे त्याने या पत्रात नमूद केले आहे. सरकार या व्यथेची दखल घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.