झटका! मुंबईकरांचे वीज बिल ५० रुपयांनी वाढणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, January 28, 2021

झटका! मुंबईकरांचे वीज बिल ५० रुपयांनी वाढणार?

https://ift.tt/3iQYmPr
म. टा. प्रतिनिधी, मुंबई खारघर-विक्रोळीदरम्यान टाकल्या जाणाऱ्या नवीन वीज वाहिनीपोटी अतिरिक्त पारेषण शुल्क वसूल करण्यास महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांचे पुढील वर्षीपासून ५० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. अदानी ट्रान्समिशन लिमिटेडकडून या वाहिनीची उभारणी सुरू आहे. मुंबईची कमाल वीज मागणी सध्या ३,५०० मेगावॉटदरम्यान आहे. त्या तुलनेत महापारेषणच्या वाहिन्यांनी येणाऱ्या विजेचा आकडा २,२०० ते २,५०० मेगावॉटदरम्यानच आहे. तसेच येत्या काळात दैनंदिन वीजमागणी पाच हजार मेगावॉटच्या घरात जाण्याची शक्यता आहे. यासाठीच अतिरिक्त वीज पारेषण वाहिन्या उभ्या केल्या जात आहेत. त्यातीलच खारघर-विक्रोळी ही ४०० केव्ही (किलोव्हॅट) क्षमतेच्या महत्त्वाच्या वाहिनीचा समावेश आहे. परंतु, या वाहिनीपोटी अतिरिक्त पारषेण शुल्क ग्राहकांकडून वसूल होणार आहे. मुंबईत अतिरिक्त वीज आणण्यासाठी महापारेषणने खारघर-विक्रोळी वाहिनी उभी करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी खारघर-विक्रोळी ट्रान्समिशन प्रा. लि. (केव्हीटीपीएल) या विशेष उद्देश कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनी अंतर्गत हे काम अदानी ट्रान्समिशन कंपनीला देण्यात आले आहे. या कामापोटी येणाऱ्या सुमारे २,२०० कोटी रुपयांचा खर्च अतिरिक्त पारेषण शुल्काच्या माध्यमातून वसूल केले जाणार आहे. यासाठी 'केव्हीटीपीएल'ने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. ती मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार मार्च २०२२ मध्ये या वाहिनीची उभारणी पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांडून पारेषण शुल्क वसूल केले जाणार आहे. दरवर्षी सरासरी २५० कोटींची वसुली या वाहिनीच्या उभारणीपोटी मार्च २०२२ ते एप्रिल २०५६ दरवर्षी सरासरी २५० कोटी रुपये पारेषण शुल्काच्या माध्यमातून वसूल केले जाणार आहेत. या वाहिनीचा फायदा मुंबईतील वीज ग्राहकांना होणार आहे. त्यामुळेच मुंबईतील ४८ लाख वीज ग्राहकांना २५० कोटी रुपयांपोटी दरमहा ५० ते ६० रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत.