
बीजिंग: भारताच्या अरुणाचल प्रदेशच्या हद्दीत बांधकाम करणाऱ्या मुजोर चीनने यावर अखेर स्पष्टीकरण दिले आहे. चीनच्या भूभागावर सुरू असलेले बांधकाम आणि विकासकामे सामान्य आहेत आणि त्यावर कुणी हरकत घेण्याचे कारण नाही,’असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी म्हटले. चीनने आक्रमक विस्तारवादी भूमिका घेतली आहे. मागील वर्षी चीनने लडाखमध्ये भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. गलवान खोऱ्यात दोन्ही सैन्यांमध्ये हिंसाचारही झाला. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले होते. लडाखमधील तणाव निवळण्यासाठी लष्करी स्तरावर चर्चा सुरू आहेत. अशातच चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये एक गाव वसवले असल्याचे समोर आले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अरुणाचल प्रदेशमधील बांधकामाबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत त्यांनी म्हटले की, ‘चीनची झग्नान प्रदेशाबाबत (दक्षिण तिबेट) भूमिका स्पष्ट आहे. ‘अरुणाचल प्रदेश’अशा काही प्रदेशाला आम्ही कधीच मान्यता दिलेली नाही. यावर (बांधकामावर) कुणी हरकत घेण्याचे कारण नाही. हा आमचा भूभाग आहे. ही बाब सामान्य आहे.’ वाचा: काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने एक गाव वसवल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या ठिकाणी साधारण १०० घरांचा समावेश आहे. या संदर्भात दोन छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पहिले छायाचित्र २६ ऑगस्ट २०१९ रोजीचे आहे. या तारखेला एकही घर या ठिकाणी नव्हते. मात्र, नोव्हेंबर २०२०मध्ये या ठिकाणी १०० घरे दिसली. वाचा: या वृत्तावर भारताने ‘देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिस्थितीवर आमचे बारकाईने लक्ष आहे. देशाचे सार्वभौमत्व जपण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत,’ अशी सावध प्रतिक्रिया दिली होती. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचावे, यासाठी सीमेवरील पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यास केंद्र सरकारने सुरुवात केल्याचे स्पष्टीकरणही परराष्ट्र मंत्रालयाने दिले. चीन अरुणाचल प्रदेशावर दावा केला असून, दक्षिण तिबेट म्हणून या प्रदेशास ओळखतो. हा भाग भारताचा अविभाज्य अंग असल्याची भारताची भूमिका आहे.