मालवाहतूक सुस्साट! रेल्वेची डिसेंबरमध्ये ११ हजार ७८८ कोटींची कमाई - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 3, 2021

मालवाहतूक सुस्साट! रेल्वेची डिसेंबरमध्ये ११ हजार ७८८ कोटींची कमाई

https://ift.tt/2Lg07sI
नवी दिल्ली : डिसेंबर २०२० मध्ये भारतीय रेल्वेने ११८.१३ दशलक्ष टन मालवाहतूक केली. हा आकडा गेल्यावर्षीच्या याच कालवधीपेक्षा ८.५४ टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी रेल्वेने १०८.८४ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली होती. या काळामध्ये रेल्वेने माल वाहतुकीतून ११७८८.११ कोटींचे उत्पन्न मिळवले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या डिसेंबरमध्ये रेल्वेने ७५७.७४ कोटी अतिरिक्त (६.८७ टक्के) उत्पन्न मिळवले आहे. गेल्या वर्षी रेल्वेला या काळात माल वाहतुकीतून ११०३०.३७ कोटी उत्पन्न झाले होते. कोविड-१९ आव्हानाला संधी मानून भारतीय रेल्वेने आपल्या कार्यक्षमता आणि कामगिरीमध्ये सुधारणा करून माल वाहतुकीतून उच्चांकी उत्पन्न मिळवले. उद्योजकांना रेल्वेच्या मालवाहतुकीकडे आकर्षित करण्यासाठी सरकारकडून विविध सवलतीही दिल्या जात आहेत. तसेच मालवाहतुकीच्या भाडेवृद्धीसाठी संस्थात्मक सुधारणाही केल्या जात असून शून्याधारित वेळापत्रकाचा समावेश करण्यात येणार आहे. रेल्वे व्हिजननुसार २०२४ पर्यंत माल वाहतूक २०२४ दशलक्ष टनापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. २०१९ मध्ये रेलवेकडून १२१० दशलक्ष टन मालाची वाहतूक करण्यात आली होती. गेल्या वर्षी देशात एकूण ४७०० दशलक्ष टन मालाची वाहतूक झाली. त्यात रेल्वेचा २७ टक्के हिस्सा होता. माल वाहतुकीतून रेल्वेला प्रचंड महसूल मिळतो. टाळेबंदीमध्ये रेलवेने मालाची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली. २०२६ पर्यंत देशातील एकूण माल वाहतूक ६४०० टनांपर्यंत पोहचेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रेल्वे व्हिजन २०२४ साठी २.९ लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के यादव यांनी नुकताच म्हटलं होतं. नॅशनल रेल्वे योजनेबाबत गुंतवणूकदार आणि इतर घटकांशी चर्चा करू आणि निर्णय घेऊ असे यादव यांनी सांगितले. रेल्वेचा खर्च कमी करणे आणि माल वाहतुकीचा दर स्पर्धात्मक करणे याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल, असे यादव यांनी सांगितले. पुढील महिनाभरात या योजनेला मंजुरी दिली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. करोना लॉकडाउनच्या काळात तर भारतीय रेल्वेने मालवाहतुकीचे अनेक विक्रम मोडले. त्यातून वेळ, मनुष्यबळ व पैशांची बचत झाली आहे. नाशवंत माल वाहून नेण्यासाठी आता रेल्वेच्या वातानुकूलित वाघिणी वापरल्या जात आहे. ग्रीनव्हॅनमधून ताजी फळे व भाज्यांची वाहतूक होते. अतिमहत्त्वाचा माल पोहोचविण्यासाठी भारतीय रेल्वेवर कंटेनर राजधानी अर्थात कॉनराज गाड्याही आहेत. आतापर्यंत मालगाड्यांनी गाठलेला उच्चतम वेग ४,७०० मेट्रिक टनासाठी ताशी १०० किलोमीटर (६२ मैल) इतका नोंदविला गेला आहे. रेल्वेने नव्या धोरणानुणार मुख्य शहरांना जोडणाऱ्या ११ हजार किलोमीटर लांबीच्या स्वतंत्र रेल्वे मार्गाच्या उभारणीला संमती दिली आहे. २ लाख २२ हजार वाघिणींची क्षमता वाढविण्यात आली आहे.