'मोदी सरकारच्या अक्षम्य चुकांची किंमत देशाला मोजावी लागत आहे' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, April 28, 2021

'मोदी सरकारच्या अक्षम्य चुकांची किंमत देशाला मोजावी लागत आहे'

https://ift.tt/3t0bm8y
मुंबईः देशात करोनाचा उद्रेक झाला आहे. रुग्णसंख्या वाढत असताना ऑक्सिजनचा तुटवडाही भासत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं जी गंभीर परिस्थिती निर्माण झालीये त्यास केंद्र सरकारचं जबाबदार आहे, असं आरोप त्यांनी केला आहे. देशात ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यास पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांच्या २० ऑक्टोबर २०२०ला घेतलेल्या पत्रकार परिषदेतून हे स्पष्ट होते. पाच महिन्यापूर्वी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय पत्रकार परिषदेत सचिवांनी सांगितले होते की, वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याबाबत भारत अत्यंत सुस्थितीत (extremely comfortable) आहे. मागील दहा महिन्यात वैद्यकीय ऑक्सीजनचा कोणताही तुटवडा जाणवला नाही आणि आतादेखील जाणवणार नाही,' असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. आरोग्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्द्यांवरुन पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष वेधलं आहे. देशभरात वैद्यकीय ऑक्सीजनचा पुरवठा वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल सांगताना आरोग्यमंत्री म्हणाले, केंद्र शासनाने देशभरातील ३९० दवाखान्यात PSAपद्धतीचे ऑक्सीजन निर्मिती प्लॅन्ट उभारण्याचे नियोजन केले आहे. करोनाची संभाव्य वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, केंद्र सरकारने १ लाख टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजन आयात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सचिवांच्या पत्रकार परिषदेतून हे स्पष्ट होते की सरकारने अतिरिक्त १ लाख मेट्रिक टन ऑक्सिजन आयात खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली. परंतु मोदी सरकारने ती कार्यान्वित केली नाही, त्यामुळे आज देशाला अभूतपूर्व ऑक्सिजन तुटवडा भासत आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी दवाखाने आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे मिनिटा-मिनिटाला हताश फोन येत आहेत. रुग्णांना रूग्णालयात दाखल करण्यास काही रुग्णालये नकार देत आहेत. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या बातम्या देशभरातून येत आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी दिल्लीतील खासगी रुग्णालयांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे. हे अत्यंत विदारक चित्र आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खालील प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत, असं म्हणत चव्हाण यांनी केंद्र सरकारला राही प्रश्न विचारले आहेत. ऑक्सीजनच्या पुरवठ्याबाबत आपण अत्यंत सुस्थितीत (extremely comfortable)आहोत, हा दावा आरोग्य मंत्रालयाने कशाच्या आधारावर केला होता? १ लाख मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजन आयातीचे काय झाले? ५ महिन्यात ते का आयात केले नाही? ही प्रक्रिया कोणी थांबवली? आतापर्यत देशभरात मंजूर केलेल्या १६२ PSA पद्धतीचे ऑक्सीजन निर्मिती प्लॅन्ट पैकी फक्त ३३ दवाखान्यातच उभा केले आहेत, हे खरे आहे का?, असे सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी २०२१ मध्ये जागतिक आर्थिक परिषदेसमोर भाषण करताना 'भारताने करोनाला कसे हरवले' अशा वल्गना करून स्वतःचीच पाठ थोपटवून घेण्याचा हास्यास्पद प्रकार आता अंगलट येत आहे. जगातील ५० पेक्षा अधिक देशांनी भारतातून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी आपल्याला त्यांच्यासमोर हात पसरावे लागत आहेत. आज देशाला मोदी सरकारने केलेल्या या अक्षम्य चुकांची आणि वेळेत न घेतलेल्या निर्णयांमुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. ज्यांचे नातेवाईक ऑक्सीजनअभावी मृत्युमुखी पडले त्यांना उत्तरे हवी आहेत. देशाच्या या दुरावस्थेला जबाबदार असलेले आरोग्य मंत्री आणि इतर जबाबदार सहकाऱ्यांना तातडीने पदच्युत केले पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 'भारताचा ऑक्सीजन पुरवठा अत्यंत सुस्थितीत extremely comfortable आहे' असे सांगितले होते. तसेच ऑक्टोबर २०२० मध्येच १ लाख टन वैद्यकीय ऑक्सीजन आयात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. असे देखील सांगितले होते. अशा या फाजील आत्मविश्वासामुळे आज देश गंभीर संकटात असून मोदी सरकारने केलेल्या या अक्षम्य चुकांची आणि वेळेत न घेतलेल्या निर्णयांमुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.