मुंबईः 'महाराष्ट्रात जास्त करोना रुग्ण सापडत आहेत हे खरं आहे. कारण राज्यात करोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. इतर राज्यात चाचण्या होत नाहीत. त्यामुळं महाराष्ट्राचं कौतुक करायला हवं आणि ते जगात होतंय आणि यातून महाराष्ट्र लवकरच बाहेर पडेल,' असं यांनी म्हटलं आहे. राज्यावर पुन्हा लॉकडाऊनची टांगती तलवार असतानाच विरोधकांकडून लॉकडाऊनचा विरोध केला आहे. यावरुन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तसंच, महाराष्ट्रातील करोना परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. मुंबईत ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. 'महाराष्ट्र आत्मनिर्भर असल्यानं मुंबई शहर देशाच्या तिजोरीत भर टाकत आहेत. पण हे संकट असं आहे की देशानं सर्व राज्यांना मदत करणं गरजेच आहे. महाराष्ट्र कोलमडलं तर देश कोलमडेल. पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारसोबत आमचं वैयक्तिक भांडण नाही. पण महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही म्हणून महाराष्ट्राची प्रत्येक बाबतीत कोंडी करायची हे लोकशाहीला धरुन नाही, असं म्हणत विरोधकांवर पलटवार केला आहे. 'लॉकडाऊन लावावा की नाही हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि याचा निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकतात. आपातकालीन परिस्थितीत राज्याच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांना असा निर्णय घ्यावा लागू शकतो,' असं राऊत यांनी म्हटलं आहे.