
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई संसर्गाची लाट मुंबईमध्ये हळूहळू खाली येत असल्याचे चित्र आहे. तरीही मागील तीन दिवसांमध्ये संसर्गित रुग्णांच्या आकड्यांमध्ये थोडीशी वाढ झालेली दिसत आहे. ठाण्यात उपचाराधीन रुग्णसंख्या घटत असली तरीही मुंबईमध्ये मात्र पहिल्या लाटेच्या तुलनेमध्ये वाढलेली आहे. पहिल्या लाटेतील ११ मेच्या उपलब्ध आकडेवारीशी वेगवेगळ्या जिल्ह्यांशी तुलना करता , रायगड, नांदेड या जिल्ह्यांमध्ये उपचाराधीन रुग्णसंख्या आता कमी झाली आहे. तर मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग, सोलापूर, जालना, बीड, लातूर, परभणी, वर्धा, गडचिरोली या ठिकाणी ती वाढलेली दिसते. संपूर्ण राज्याचा विचार केल्यास पहिल्या लाटेमध्ये तीन लाख १ हजार ७५२ उपचाराधीन रुग्ण होते तर दुसऱ्या लाटेमध्ये हे प्रमाण ५ लाख ५८ हजार ९९६ इतके आहे. टक्केवारीमध्ये ही वाढ ८५.२५ टक्के आहे. मुंबईमध्ये पहिल्या लाटेतील सर्वाधिक उपचाराधीन रुग्णसंख्या ही ३४,२५९ इतकी होती. ११ मे रोजी ती ४०,१६२ इतकी नोंदवण्यात आली. टक्केवारीमध्ये ही वाढ १७.२३ टक्के इतकी आहे. तर ठाण्यात पहिल्या लाटेमध्ये ३८ हजार ३८८ उपचाराधीन रुग्ण होते. ११ मे रोजी ३१ हजार ४४६ रुग्णांची नोंद झाली. ठाण्यात उपचाराधीन रुग्णसंख्या १८.०८ टक्क्यांनी घटली आहे.