करोना रुग्णसंख्या कमी होताच मनसेचा सरकारला संतप्त सवाल, दुटप्पी भूमिकेवर म्हणाले... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 11, 2021

करोना रुग्णसंख्या कमी होताच मनसेचा सरकारला संतप्त सवाल, दुटप्पी भूमिकेवर म्हणाले...

https://ift.tt/3eCDM4U
मुंबई : राज्यात करोनाची साखळी तोडण्यात पुन्हा एकदा यश येताना दिसत आहे. पण यावरूनही आता वेगळंच राजकारण सुरू झालं आहे. कारण, रुग्णसंख्या कमी होण्याच्या श्रेयावरून मनसेनं आता राज्य सरकारला टार्गेट केलं आहे. खरंतर, राज्यात आज दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून हा खूप मोठा दिलासा आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ३७ हजार ३२६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून गेल्या काही आठवड्यांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. विशेष म्हणजे ६१ हजार ६०७ इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आज करोनावर मात करून घरी परतले आहेत. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन रिकव्हरी रेट ८७ टक्क्यांच्या जवळ पोहचला आहे. यावर रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार कमी झाली की सरकारचं यश अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यम कशी घेऊ शकतात??? अशा थेट सवाल मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला. यासंबंधी त्यांनी एक ट्वीटही केलं. ज्यामध्ये रुग्णसंख्या कमी होणं ही खूप चांगली बाब आहे. याचं श्रेय मुख्यमंत्री आणि सरकार घेत आहे. पण रुग्ण संख्या वाढली की त्याला नागरिक बेजबाबदार आणि कमी झाली की सरकारचं यश अशी दुटप्पी भूमिका सरकार कशी घेऊ शकतं अशी टीका त्यांनी केली आहे. दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत ३७ हजार ३२६ नवीन रुग्णांची भर पडली असून त्याचवेळी ६१ हजार ६०७ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ४४ लाख ६९ हजार ४२५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते असून सध्या हे प्रमाण ८६.९७ टक्के इतके झाले आहे. राज्यात आज करोनाने ५४९ रुग्ण दगावले असून राज्यातील करोना मृत्यूदर १.४९ टक्के इतका आहे. आतापर्यंत करोनाच्या २ कोटी ९६ लाख ३१ हजार १२७ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून त्यातील ५१ लाख ३८ हजार ९७३ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १७.३४ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ३६ लाख ७० हजार ३२० व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २६ हजार ६६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. सात लाखांच्या उंबरठ्यावर पोहचलेला हा आकडा कमी कमी होऊन आज सहा लाखांच्या खाली आला आहे. सध्या राज्यात ५ लाख ९० हजार ८१८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण असले तरी तेथील आकडा १ लाखाच्या आत आला आहे. पुणे जिल्ह्यात आता ९७ हजार ५९३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात ५६ हजार ४५८, मुंबई पालिका क्षेत्रात ४७ हजार ५४, नाशिक जिल्ह्यात ३४ हजार ७५५ तर ठाणे जिल्ह्यात ३४ हजार १८५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत आज १ हजार ७८२ तर पुणे पालिका हद्दीत आज १ हजार २७२ नवीन रुग्णांची भर पडली.