दहशतीच्या दरडींखाली! रायगड जिल्ह्यात ८५, तर साताऱ्यात १२ जण अद्याप बेपत्ता - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, July 25, 2021

दहशतीच्या दरडींखाली! रायगड जिल्ह्यात ८५, तर साताऱ्यात १२ जण अद्याप बेपत्ता

https://ift.tt/3hYc585
टीम मटा रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे महापुराच्या संकटाचा सामना करत असतानाच काळकड्यांनीही घाव घातल्याने झालेल्या जखमा दीर्घकाळ ठसठसणार असल्याचे दिसू लागले आहे. रायगडमधील महाडजवळ तळीये हे अख्खे गाव दरडीखाली गाडले गेले. त्यानंतर आसपासच्या कडेकपारीतील गावांमधील रहिवाशांवर दहशतीच्या दरडी कोसळू लागल्या आहेत. कुठे जमीन खचल्याच्या, तर कुठे लहान-मोठ्या दरडी कोसळल्याच्या बातम्या येऊन आदळत असल्याने रात्रीची झोपही कठीण झाली आहे. साताऱ्यामध्येही दरडींखाली अडकलेल्यांच्या मृत्यूमध्ये वाढ होत असल्याने हे काळकड्यांचे संकट कुटुंब, नातेवाईकांना मोठे व्रण देऊन जाणार आहे. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांकडून दरडीखाली अडकलेल्यांच्या शोधासाठी शर्थ करण्यात येत आहे. मात्र, त्यांच्यासमोरील आव्हान मोठे असल्याने शोधकार्य सुरूच आहे. गावांमधील नागरिक चिंताग्रस्त म. टा. वृत्तसेवा, अलिबाग जिल्ह्यातील तळीये व पोलादपूर येथील कानवळे व सुतारवाडी येथील दरड दुर्घटनेनंतर महाड, पोलादपूर तालुक्यातील डोंगरकपारीत असलेल्या गावातील रहिवाशांना चिंतेने पोखरले आहे. आपत्तीच्या धसक्याने जीव मुठीत घेऊन रात्र काढत आहेत. त्यातच शनिवारी रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडी परिसरातील जमिनीला भेगा गेल्या असून तेथील माती ढासळू लागली असल्याने रहिवाश्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. गुरुवारी तळीये गावातील ३२ घरांवर दरड कोसळून तेथील कुटुंबे मातीखाली गाडली गेली. येथील सुमारे ४२ कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. आतापर्यंत ४० मृतदेह बाहेर काढण्यात आली असून दोन महिलांना वाचवण्यात यश आले आहे. अजूनही ४४ जण ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे. गावातील आठ कुटुंबे बाहेर गावी गेली असल्याचे सांगण्यात येते.