तळीये ग्रामस्थांना दिवाळीत घरे मिळणार? गावाची म्हाडा अधिकाऱ्यांकडून पाहणी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 6, 2021

तळीये ग्रामस्थांना दिवाळीत घरे मिळणार? गावाची म्हाडा अधिकाऱ्यांकडून पाहणी

https://ift.tt/3yMUK7l
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई रायगड जिल्ह्यातील तळीयेसह आसपासच्या भागात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जीवितहानी होतानाच अनेक घरांची वाताहात झाली. त्यातील तळीये गावातील अतिवृष्टीने उद्धवस्त् झालेल्या घराची उभारणी दिवाळीपर्यंत पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळातील अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तळीये गावात पाहणी करून घरांची कामे वेगात पूर्ण करण्यावर भर दिला आहे. राज्य सरकारने तळीये गावासह आजूबाजूच्या पाड्यातील २६१ घरांची उभारणी करून तिथल्या स्थानिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी म्हाडावर सोपविली आहे. ही जबाबदारी योग्यरितीने पूर्ण करण्यासाठी म्हाडाकडून आवश्यक ती कामे केली जात आहे. म्हाडामार्फत त्याचा पहिला भाग म्हणून वांद्रे येथील मुख्यालयात पुनर्वसन घरांची प्रतिकृती तयार केली आहे. म्हाडाच्या नियोजनाप्रमाणे दरडग्रस्त गाव आणि वाड्यांचे पुनर्वसन प्रकल्प असे दोन टप्पे केले जात आहेत. त्यापैकी, पहिल्या टप्प्यात दिवाळीपर्यंत तळीये गावातील ६३ कुटुंबासाठी घरे बांधली जातील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आजूबाजूच्या पाड्यातील कुटुंबीयांसाठी घरे बांधली जाणार आहेत. म्हाडाकडून मार्च २०२२ पर्यंत दुसऱ्या टप्प्यातील घरांची बांधणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तळीये गावात घरे बांधण्याच्या अनुषंगाने कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. नितीन महाजन यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. त्यावेळी घरांबाबत स्थानिकांची नेमक्या गरजांबाबत माहिती घेण्यात आली. तसेच, गावाचा विकास आराखडा तयार करण्याबाबत लवकरच म्हाडा अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे. त्याचवेळी, म्हाडाच्या वांद्रे मुख्यालयात दोनपैकी एका प्रतिकृतीचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या प्रतिकृतीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या दोन्ही प्रतिकृती पूर्ण झाल्यानंतर त्यापैकी एका प्रतिकृतीची निवड केली जाणार असून त्यानुसार घरे बांधली जातील, असे म्हाडा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.