मलेरिया, डेंग्यूचा ताप वाढला; रुग्णांना जमिनीवर दाखल करुन घेण्याची वेळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 6, 2021

मलेरिया, डेंग्यूचा ताप वाढला; रुग्णांना जमिनीवर दाखल करुन घेण्याची वेळ

https://ift.tt/2WVJl8c
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबईः मुंबईत मलेरिया, डेंग्यूच्या तापाने डोके वर काढले असून इतर पावसाळी आजारांचा तापही वाढला आहे. मागील दीड वर्षापासून करोना रुग्ण अधिक असलेल्या रुग्णालयांमध्ये आता पावसाळी आजारांच्या रुग्णांची गर्दी वाढती आहे. पालिकेसह सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी कोणत्याही रुग्णाला नकार दिला जात नसला, तरीही अतिदक्षता विभागामध्ये खाटांची उपलब्धता अत्यंत कमी आहे. त्यामुळे प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णालाही काही तास आपत्कालीन कक्षामध्ये थांबून राहावे लागत आहे. पालिकेच्या काही रुग्णालयांमध्ये जमिनीवरही रुग्णांना दाखल करण्याची वेळ आली आहे. परळ येथील वीणा पवार यांच्या भावाला शनिवारी रात्री उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यामुळे तातडीने एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना खासगी रुग्णालयातील उपचार परवडणारे नव्हते. भावाला आयसीयूमध्ये हलवणे गरजेचे होते. मात्र रात्रभर फोनाफोनी केल्यानंतरही सरकारी रुग्णालयांमध्ये आयसीयू खाट उपलब्ध होऊ शकली नाही. रुग्णालयांनी वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करून घेण्याची तयारी दर्शवली, आयसीयू खाट मात्र उपलब्ध झाल्यानंतरच देण्यात येईल, असे सांगण्यात आले. असे अनुभवही काही रुग्णांच्या कुटुंबीयांना येत आहेत. करोनाकाळामध्ये रुग्णांना जमिनीवर ठेवणे योग्य नाही. रुग्णालयात अन्य आजारांमुळे दाखल असलेल्या रुग्णांसोबत कुटुंबातील एक सदस्य असतो. या व्यक्ती सतत आतबाहेर करत असतात. त्यामुळे अस्वच्छता पसरण्यासह रुग्णांना इतर संसर्ग होण्याचीही भीती असते. रुग्णसंख्या वाढत असली, तरीही पालिका रुग्णालयांमध्ये कोणत्याही रुग्णाला नकार दिला जात नाही. त्यामुळे रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसांत 'फ्लोअरबेड' उपलब्धता करावे लागतात, असे पालिकेतील वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. चाचण्यांना विलंब संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. ए. एस. वेल्हे यांनी चाचण्या उशिरा केल्या जात असल्याचे निरीक्षण नोंदवले. सर्वसामान्यांच्या मनात करोनाची भीती कमी होऊ लागली आहे. त्यामुळे ताप आल्यानंतर तीन दिवसानंतरही करोनाची चाचणी केली जात नाही. तापाची तीव्रता वाढल्यानंतर उपचारांसाठी धावाधाव केली जाते. पावसाळी आजारांचा विचार करता, डेंग्यू आणि स्वाइन फ्लू यांची वैद्यकीय निदान निश्चिती होईपर्यंतही काही दिवसांचा कालावधी जातो, असेही दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील रुग्णसंख्या मलेरिया ७९० डेंग्यू १३२ गॅस्ट्रो २७६ लेप्टो ३७ (ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत)