
दुबई : विश्वचषकाच्या इतिहासात भारतावर पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभूत होण्याची आपत्ती ओढवली. आतापर्यंत एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतीय संघ कधीच पाकिस्तानकडून पराभूत झाला नव्हता. पण विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ही विजयाची परंपरा कायम राहिली नाही. भारताने पाकिस्तानपुढे विजयासाठी १५२ धावांचे आव्हान ठेवले होते. पण पाकिस्तानच्या फलंदाजांनी हे आव्हान सहजपणे पेलवले आणि इतिहास बदलला. भारताने प्रथम फलंदाजी करताना कशाबशा १५१ धावा केल्या होत्या. पण पाकिस्तानच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजीचा पुर्णपणा पालापाचोळा केल्याचेच पाहायला मिळाले. पाकिस्तानच्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी भारतीय गोलंदाजांचा खरपूस चमाचार घेतला आणि त्यांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले. या बाबर आणि रिझवान यांनीच पाकिस्तानला विजय मिळवून देत मोलाचा वाटा उचलला. यापूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीने भारताच्या दोन्ही सलामीरीवांंना झटपट बाद करून भारताला दुहेरी धक्के दिले होते. या धक्क्यातून विराट कोहलीने अर्धशतक झळकावत संघाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. विराटने यावेळी ४९ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटाकराच्या जोरावर ५७ धावांची खेळी साकारली. रिषभ पंतबरोबरही कोहलीने पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. त्यामुळेच भारतीय संघाला १५१ धावांपर्यंत मजल मारता आली होती. पण ही धावसंख्या पाकिस्तानसाठी आव्हानात्मक ठरली नाही. कारण पाकिस्तानच्या बाबर आणि रिझवान या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतके पूर्ण करत भारतीय गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. त्यामुळे पाकिस्तानला हा सामना सहजपणे जिंकता आला. बाबर आणि रिझवान यांना झटपट बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आले. सराव सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. पण या सामन्यात जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार यांना चांगली गोलंदाजी करता आली नाही. पहिल्या पॉवर प्लेमध्ये या तिघांनाही विकेट्स मिळवण्यात अपयश आले आणि याचाच मोठा फटका भारतीय संघाला बसल्याचे पाहायला मिळाले. बाबर आणि रिझवान यांनी भारताच्या गोलंदाजीला आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले आणि संधाला विजय मिळवून दिला.