४० रुपयांची लूट, खटला चालला ४३ वर्षे; पुराव्याअभावी आता आरोपीची निर्दोष मुक्तता - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 25, 2021

४० रुपयांची लूट, खटला चालला ४३ वर्षे; पुराव्याअभावी आता आरोपीची निर्दोष मुक्तता

https://ift.tt/3b4qMCr
: न्यायालयीन प्रकरणे अनेकदा वर्षानुवर्षे रखडतात. नागपूर शहरातील असाच एक तब्बल ४३ वर्षे सुरू होता. दरम्यानच्या काळात या प्रकरणातील फिर्यादीसह तीन आरोपींचा तसंच सात साक्षीदारांचा मृत्यूही झाला. या प्रकरणातील एकच आरोपी जिवंत राहिला. मात्र आता त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे नसल्याने अखेर न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. भीमराव नितनवरे (वय ६५) असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. ते २३ वर्षांचे असताना त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला होता. ही घटना १३ जानेवारी १९७८ला हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. नितनवरे व त्यांचे साथीदार रमेश मेश्राम, मधुकर पाटील, हिरामण ढोके (तिघेही मृत) यांनी फिर्यादी मोतीराम दामाजी कोठाडे (मृत) यांना रस्त्यात गाठले. त्यांच्याकडे दूधविक्रीतून मिळालेले ४० रुपये होते. आरोपींनी चाकूच्या धाकावर त्यांच्याकडून हे पैसे चोरले, दुखापतही केली, असा आरोप होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मेश्रामला अटक केली. मात्र, इतर तिघे काही काळ फरार होते. पुढे नितनवरेंना अटक करण्यात आली. मात्र, त्यांची जामिनावर सुटकाही झाली. अनेक वर्षे हा खटला प्रलंबित राहिला. आरोपींपैकी केवळ नितनवरेच जिवंत आहेत. अखेर २०१९ मध्ये या प्रकरणाच्या खटल्याला सुरुवात झाली. 'खटल्याची सुनावणी सुरू होईपर्यंत प्रकरणाशी निगडित अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचा मृत्यू झाला होता. त्यामुळे स्वाभाविकच पोलिसांना आरोपीविरुद्ध फारसे पुरावे सादर करता आले नाहीत. तसंच स्पॉट पंचनाम्याच्या आधारावर याप्रकरणी आरोपीला दोषी मानले जाऊ शकत नाही, असा निर्वाळा देत न्यायाधीश पी. वाय लाडेकर यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली’, असे नितनवरे यांचे वकील अमित बंड यांनी सांगितलं आहे.