
जालंधरः पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसमधील कलह हाताळण्यात जे नेते अपयशी ठरले आहेत तेच आता माझी बदनामी करत आहेत. एकीकडे हरीश रावत म्हणतात, ४३ आमदारांनी माझ्याविरोधात पत्रे लिहिली. आता रणदीप सुरजेवाला सांगत आहेत की ७९ आमदारांपैकी ७८ आमदारांची पत्रे मिळाली. यावरून संपूर्ण काँग्रेस पार्टी सिद्धूच्या कॉमेडीच्या रंगात रंगली आहे, असा सणसणीत टोला अमरिंदर सिंग यांनी लगावला. पंजाब विधानसभेच्या सर्व १७७ आमदरांनी पत्रे लिहिली होती, असा दावाही उद्या काँग्रेस नेते करतील. ४३ आमदारांवर दबाव आणून त्यांच्याकडून स्वाक्षऱ्या घेतल्या गेल्या. आपलं अपयश लपवण्यासाठी काँग्रेस नेते आता खोटं बोलत आहेत, असं अमरिंदर सिंग म्हणाले. काँग्रेस पक्षातील स्थितीवर अमरिंदर यांनी विनोदही केला. काँग्रेस नेते खोटं बोलतानाही एकमेकांमध्ये समन्वय ठेवू शकत नाही. काँग्रेस पूर्ण अस्थिर झाली आहे. हे संकट सतत वाढत आहे. काँग्रेसमधील बहुतेक वरिष्ठ नेत्यांचे पक्षातील कामकाजावरून मन उडाले आहे, असं अमरिंदर सिंग यांनी सांगितलं. काँग्रेसने २०१७ नंतर पंजाबमधील प्रत्येक निवडणूक जिंकली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने ७७ जागा जिंकल्या होत्या. यानंतर पोटनिवडणुकीत ४ पैकी ३ जागा जिंकल्या. सुखबीर बादल यांचे वर्चस्व असलेल्या जलालाबादची जागाही काँग्रेसने जिंकली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने १३ पैकी ८ जागा जिंकल्या. त्यावेळी संपूर्ण देशात भाजपची लाट होती, असं ते म्हणाले. यावर्षी फेब्रुवारीमध्ये ७ महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. काँग्रेसने ३५० पैकी २८१ जागा जिंकल्या म्हणजे ८०.२८ टक्के. नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. यात १०९ पैकी ९७ काँग्रेसचे नगरसेवक जिंकले. काँग्रेसने २,१६५पैकी १,४८६ प्रभाग जिंकले म्हणजे ६८ टक्के. सुरजेवालांनी दावा केल्याप्रमाणे पंजाबचा माझ्यावरील विश्वास उडाला नव्हता. नवज्योत सिंग सिद्धू यांच्या इशाऱ्यावरून काही नेते आणि आमदारांनी हे संपूर्ण वातावरण तयार केले, असं अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं.