परमबीर सिंग यांच्या विरोधात राज्य सरकार पुन्हा न्यायालयात जाणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 26, 2021

परमबीर सिंग यांच्या विरोधात राज्य सरकार पुन्हा न्यायालयात जाणार?

https://ift.tt/3DTLB0f
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई ठाण्यात पाच खंडणीचे गुन्हे आणि दोन प्रकरणांत खुली चौकशी सुरू असतानाही गुंगारा देणारे माजी पोलिस आयुक्त गुरुवारी अचानक मुंबईत हजर झाल्याने सर्वच यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या चौकशीला सामोरे गेलेल्या परमबीर यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), चांदीवाल आयोग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यांच्याकडेही चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. परमबीर पूर्ण तयारीनिशी मुंबईत दाखल झाल्याने तपास यंत्रांनाही चौकशीसाठी पूर्वतयारी सुरू केली आहे. परमबीर सिंह यांच्यावर मुंबई आणि ठाण्यात मिळून पाच गुन्हे दाखल आहेत. मुंबईतील गोरेगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखा करीत आहे. ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात सिंह यांच्यासह एकूण पाच जणांविरुद्ध तर ठाणे नगर पोलिस सिंह यांच्यासह एकूण २८ जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल आहे. यामध्येही काही पोलिसांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यातील कोतवाली पोलिस ठाण्यात परमबीर यांच्यासह ३३ जणांवर दाखल करण्यात आलेला खंडणीचा गुन्हा कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात चौकशीसाठी वर्ग करण्यात आला. या तीन गुन्ह्यांपैकी कोपरी आणि बाजारपेठ तसेच मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सीआयडी करीत आहे. याबरोबरच सिंह यांच्यावर दोन पोलिस अधिकाऱ्यांनी भ्रष्टचाराचे आरोप केले असून त्यावरून एसीबीकडून खुली चौकशी सुरू आहे. तर चांदीवाल आयोगानेही गैरहजर राहिल्यामुळे दोन वेळ परमबीर यांना दंड ठोठावला आहे. त्यामुळे परमबीर यांना या सर्व ठिकाणी हजर राहावे लागणार आहे. कायदेशीर सल्ला घेणार परमबीर यांच्या विरोधात अनेक गुन्हे आणि चौकशी सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण देताना नेमके कोणत्या गुन्ह्यात आणि कोणते संदर्भ घेऊन दिले आहे याचा अभ्यास तपास यंत्रणांकडून केला जात आहे. ६ डिसेंबरपर्यंत संरक्षणाचा अवधी बराच असल्याने त्याआधी याबाबत पुन्हा न्यायालयात जाता येईल का? याबाबतची चाचपणी सरकारच्या वतीने केली जात आहे. तपास यंत्रणाही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवलोकन करून कायदेशीर सल्ला घेत आहेत. ...म्हणून आधी गुन्हे शाखा परमबीर यांच्यावर असताना गुन्हे दाखल असताना त्यांनी सर्वप्रथम गुन्हे शाखेला सामोरे जाण्याचे ठरविले. गुन्हे शाखेकडे तपास असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले असून मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरु करण्यासही परवानगी देण्यात आली. ३० दिवसांच्या आत हजर न झाल्यास मालमत्तावर टाच येणार हे निश्चित असल्याने परमबीर हे प्रथम या गुन्ह्यात चौकशीसाठी हजर झाल्याचे म्हटले जात आहे.