
: एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राज्यभर रान उठवणाऱ्या भाजपने आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या () मुद्द्याला हात घातला आहे. त्यामुळे आधीच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील ३ आठवड्यांपासून सुरू असलेल्या संपामुळे कात्रीत सापडलेल्या राज्य सरकारसमोर नवं आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. सोलापुरात आज झालेल्या भाजपच्या पत्रकार परिषदेत पक्षाचे नेते आणि माजी सहकारमंत्री यांनी मराठा समाजाला आरक्षण न देवू शकलेल्या महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. राज्यात भाजपचे सर्वच नेते निरनिराळ्या मुद्द्यावर सरकारवर शाब्दिक हल्ले चढवत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला धार आणण्याचं काम भाजपने केलं. तो मुद्दा अद्यापही निकाली निघाला नाही, तोवरच आज नेत्यांनी राज्यात संवेदनशील असलेल्या मराठा समाजाच्या प्रश्नांवर लक्ष्य केंद्रित केलं आहे. 'सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक' 'सध्याचं आघाडी सरकार हे मराठा समाजाची फसवणूक करत आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा लाभ खऱ्या अर्थाने हा युती सरकारच्या काळामध्ये मिळाला. मराठा समाजासाठी योजना अगोदरपासून आहेत, मात्र खरा लाभ हा युती सरकारच्या काळात झाला. अशा योजनांप्रती हे आघाडी सरकार उदासीन आहे,' असा आरोप देशमुख यांनी या पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, विद्यार्थी वसतीगृह बांधकाम असेल किंवा अन्य योजना असतील या सरकारने मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे सरकारने मराठा समाजाची माफी मागावी आणि एक चांगली समिती गठित करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावा, असं आवाहनही माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे.